Thursday, July 26, 2012

लाभधारकांचा मित्र - पी.आय.पी.


जल वास्तव-११
लाभधारकांचा मित्र - पी.आय.पी.
प्रास्ताविक:
     पी.आय.पी. म्हणजे प्राथमिक सिंचन कार्यक्रम. पाण्याचे अंदाजपत्रक. सिंचन प्रकल्पातील पाणी वापर दर हंगामात कसा करायचा याचे नियोजन म्हणजे पी.आय.पी. जलाशयात प्रत्यक्ष पाणीसाठा किती आहे, त्यापैकी सिंचनाकरिता नक्की किती पाणी उपलब्ध होईल, या हंगामात कोणती पिके घेता येतील, किती पाणी-पाळ्या मिळतील, दोन पाणी-पाळ्यातील अंतर किती दिवसांचे असेल, इत्यादी माहिती पी.आय.पी.मूळे मिळते. शेतक-यांसाठी ती अतिशय महत्वाची आहे. उपयुक्त आहे. कारण शेतक-यांना त्यामूळे प्रत्येक हंगामात पिकांचे नियोजन करता येते. पी.आय.पी.त जाहीर केल्याप्रमाणे सगळा सिंचन कार्यक्रम प्रत्यक्षात खरेच होतो आहे ना यावर लक्ष ठेवता येते. त्यासाठी आग्रह धरता येतो. पाठपुरावा करता येतो. सिंचन हंगाम सुरळित पार पडणे आणि सर्व पाणी-पाळ्या वेळेवर मिळणे याला शेतक-यांच्या दृष्टिने किती महत्व आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामूळे पिक चांगले येते. उत्पादन वाढते. आणि मुख्य म्हणजे उत्पनात भर पडते. म्हणून तर पी.आय.पी.ला लाभधारकांचा मित्र म्हणायचे! या आपल्या मित्राची ऒळख आपण या लेखात करून घेऊ.

पी. आय. पी.- आधारभूत शासन निर्णय व पत्र

      जल संपदा विभागाने पी.आय.पी.संदर्भात एक चांगला शासन निर्णय (जी.आर.) काढला आहे. आणि सर्व अधिका-यांना उद्देशून एक तपशीलवार पत्रसुद्धा लिहिले आहे. लाभधारक, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व सचिव, कालवा सल्लागार समितीचे सदस्य आणि पाणी वाटपात रस असणा-या सर्वांकडे हा जी.आर. व ते पत्र असले पाहिजे. त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. त्या आधारे शासकीय बैठकांमध्ये भाग घेतला पाहिजे. म्हणून मुद्दाम त्या जी.आर. व पत्राचा तपशील चौकटीत दिला आहे.
____________________________________________________
प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पी.आय.पी.): जी.आर. व पत्र
) धरणात साठणा-या पाण्याच्या वापराचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे - एकत्रित शासन निर्णय क्र. संकीर्ण १०.००/(१९/२०००)/ सिं.व्य.(धो) दि...२००१
) पत्र क्र. सीडीए १००४/(३६५/२००४)लाक्षेवि (कामे) दि.२६.१०.२००४
_________________________________________________________


कोणी व कधी करायचा? मंजूरी कोणी द्यायची?

           पी.आय.पी.सर्वसाधारणत: कार्यकारी अभियंत्याने दर हंगामापूर्वी करणे अपेक्षित आहे. खरीपाचा पी.आय.पी. ३१ मे च्या अगोदर तर रब्बी व उन्हाळी हंगामांचा एकत्रित पी.आय.पी.१५ सप्टेंबर पूर्वी अधीक्षक अभियंत्याने मंजूर केला पाहिजे. या तारखा ठरविण्यामागे शासनाचा हेतू असा आहे की, खरीप व रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी साधारण एक महिना अगोदर नियोजन तयार असावे. त्या महिन्यात मग जाहीर प्रकटन काढून लाभधारकांना पी.आय.पी.तला तपशील सांगणे, पाणीपट्टी व देखभाल-दुरूस्तीबाबत सूचना देणे, पाणी अर्ज मागवणे, पाणी अर्जांची छाननी करणे व ते मंजूर अथवा नामंजूर करणे, आलेल्या पाणीअर्जां आधारे पहिल्या पाणी-पाळीचे नियोजन व तयारी करणे आणि या सर्वां आधारे सिंचन हंगाम वेळेवर सुरु करणे ही प्रक्रिया अभिप्रेत आहे.
         खरीपात हे सर्व बहुतेक ठिकाणी होत नाही कारण पाण्याच्या उपलब्धतेबाबत त्या हंगामात एकतर अनिश्चितता असते किंवा पाऊस झाला तर सिंचनाची गरज भासत नाही. पण ज्या प्रकल्पांत निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर) मुद्दाम ठेवला गेला आहे आणि जेथे पाऊस ऊशीराने येतो किंवा मध्येच ताण देतो असा पूर्वानुभव आहे तेथे खरीपात देखील पी.आय.पी. करण्याची काळजी अधिका-यांनी जाणीवपूर्वक घेतली पाहिजे. निसर्गावरचे अवलंबत्व हे कायमच राहणार. त्याचे दुष्परिणाम मात्र काही अंशी जागरूक व्यवस्थापनाने कमी करता येतात. ते केले पाहिजेत.
      १५ सप्टेंबर पर्यंत मात्र सर्वसाधारणत: त्या वर्षीच्या पर्जन्यमानाची स्थिती पुरेशी स्पष्ट झालेली असते. धरण भरायला सुरूवात झालेली असते. १५ ऑक्टोबरला (रब्बी हंगामाचा पहिला दिवस) धरणात किती साठा असु शकेल याबाबत ब-यापैकी अंदाज बांधता येतो. सर्वसामान्य पावसाचे वर्ष असेल तर धरण पूर्ण भरेल असे गृहित धरून पी.आय.पी. करा आणि पाण्याच्या प्रत्यक्ष उपलब्धतेनुसार दर आठवडयाला आढावा घेत पी.आय.पी.त निश्चित केलेल्या कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा. जरूर असेल तर सुधारित पी.आय.पी. करा अशा शासनाच्या सूचना आहेत. एवढेच नव्हे तर  पाणी उपलब्धतेच्या टक्केवारीनुसार अमुक टक्के पाणी असेल तर काय करायचे असे तपशीलवार मार्गदर्शन उपरोक्त जी.आर. मध्ये करण्यात आले आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाचे वर्ष नसेल/दुष्काळाचे सावट असेल तर काय करायचे याबाबतही त्या जी.आर.मध्ये तपशीलाने सूचना देण्यात आल्या आहेत.(या वर्षी त्या जास्त उपयोगी पडतील)
       ज्या प्रकल्पात  रब्बी व उन्हाळी असे दोन हंगाम नियोजित असतात तेथे  दोन्ही हंगामांचा पी.आय़.पी. एकत्रित केला पाहिजे. उन्हाळ्यात किमान किती पाणी लागेल याचा विचार करून रब्बी व उन्हाळी हंगामांचा तपशील ठरवला पाहिजे. १५ ऑक्टोबर पर्यंत जलसाठा निश्चित कळतो. त्या आधारे आता नियोजन जास्त चांगले करता येते. रब्बी हंगामात नियोजना प्रमाणे प्रत्यक्ष पाणी वापर झाला तर उन्हाळ्यात अडचण येत नाही. रब्बी हंगामाच्या अखेरीस म्हणजे साधारणत: फेब्रुवारीच्या दुस-या/ तिस-या आठवडयात अधिका-यांनी पाणी उपलब्धतेचा आढावा घेऊन गरज भासल्यास उन्हाळी हंगामाच्या पी.आय.पी.त योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत.
       वरील विवेचना वरून एक महत्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे पी.आय.पी. हा प्रकार गतिशील (डायनामिक) आहे. एकदा केला आणि संपला असे त्यात नसते. प्रत्यक्ष परिस्थितीनुसार वेळोवेळी त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे. विज्ञान व व्यवस्थापन यांचा संगम त्यात आहे. व्यवस्थापनाची ती एक कला आहे. प्रयत्नाने ती जमली तर सगळे सुरळित पार पडते. व्यवस्थापनाची घडी बसते. अधिकारी व लाभधारक दोघांना शिस्त लागते.
       काही वर्षांपूर्वी, निदान जुन्या सिंचन प्रकल्पात तरी, अधिकारी ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायचा प्रयत्न करायचे. तेथील लाभधारकही अनुभवी असल्यामूळे त्यांचे या प्रक्रियेवर लक्ष असायचे. कालवा सल्लागार समित्यांच्या बैठका व्हायच्या. अधिकारी व लाभधारक दोघांच्या प्रयत्नातून सिंचन व्यवस्थापनात बरेच काही चांगले घडायचे. काही जुने जाणते अधिकारी आजही त्यांच्या आठवणी सांगतात. "आम्ही पी.आय.पी. करायचो. अधीक्षक अभियंता तो तपासायचे.घाम फुटायचा मंजूरी मिळेपर्यंत" आजही अनेक अधिकारी त्यांच्या कडून जेवढे होईल तेवढे करायचा जरुर प्रयत्न करतात. पण आता काळ बदलला. चांगल्या सवयी "बाळबोध" ठरो लागल्या. पी.आय.पी.करणे हा बावळटपणा झाला. पुढारी म्हणेल तसे करायचे. उजडेल तेथे उजडेल. काsssही होत नाही. होईल तेव्हा बघु हा आजचा फंडा आहे. आणि खरेच काही होत नाही! शेतकरी संघटित नाहीत. व्यवस्थापनाचा अभ्यास कोणाचाच नाही. लघु व मध्यम प्रकल्पात कशाचा कशाला पत्त्या नाही. मोठया प्रकल्पात थॊडी काळजी घ्यायची. पुणे, मुंबई व तत्सम काही भागात होते जरा बोंबाबोंब. तेवढे फक्त सांभाळायचे. व्यवस्थापन म्हणजे "माणसे मॅनेज करणे"! आता पी.आय.पी.(पाण्याचे अंदाजपत्रक) न करता सरळ वॉटर ऑडिट (जललेखा) करण्याची किमया आम्ही करू शकतो!
      प्रस्तुत लेखकाने माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत पी.आय.पी.बाबत काही माहिती गोळा करायचा प्रयत्न नुकताच केला. जल संपदा विभागाच्या सचिवांकडे जलसंकटाच्या पार्श्वभूमिवर काही माहिती मागितली. मासलेवाईक उत्तर आले. पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी. माहिती अधिकार कायद्यांतर्गत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मग!
       पी. आय.पी.चा अभियांत्रिकी, सामाजिक, आर्थिक व कायदेशीर तपशील काय आहे हे मात्र आपण या सदरात समजाऊन घेऊ. कोणी सांगावे? परिस्थिती पी.आय.पी.हे सिंचन व्यवस्थापनाचे हत्यार वापरायला आपल्याला भाग पाडेल!
 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 26 July- 1 August 2012]

Wednesday, July 25, 2012

सुनियोजित व सर्वसमावेशक जल विकासाची मार्गदर्शक सूत्रे



सुनियोजित व सर्वसमावेशक जल विकासाची मार्गदर्शक सूत्रे

हाराष्ट्र शासन
जल संपदा विभाग
एकत्रित शासन निर्णय क्र. संकीर्ण ४२०/(३०२/२०१२)/ सिंचन विकास(धोरण)
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक:२६ जूलै २०१२
    वांग मराठवाडी सिंचन प्रकल्प, जिल्हा सातारा येथे काही समाज विघातक शक्ती महाराष्ट्राच्या जल विकासात अडथळा आणण्याच्या हेतूने आंदोलन करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. असे प्रकार वाढत्या संख्येने व तीव्रतेने होत असल्यामूळे त्याबाबत काय धोरण स्वीकारावे हा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने नेमलेल्या खेळकर समितीचा अहवाल आता शासनास प्राप्त झाला आहे. खेळकर समितीच्या शिफारशी लक्षात घेता सुनियोजित व सर्वसमावेशक जल विकासाची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याकरिता खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. प्रस्तुत विषयासंबंधीचे यापूर्वीचे शासन निर्णय, ज्ञापन, परिपत्रके या शासन निर्णयाने अधिक्रमित करण्यात येत असून तो पूर्वलक्षी पद्धतीने अंमलात आला आहे असे मानण्यात येईल.
शासन निर्णय

) राज्यातील दूर्बल घटकांची वसतीस्थाने नेमकी कोठे आहेत हे निश्चित करण्यासाठी एका बहूराष्ट्रीय कंपनीची तातडीने नेमणूक करण्यात येत आहे. त्या कंपनीने अत्याधूनिक तंत्रज्ञाना आधारे नियुक्तीच्या दिनांकापासून तीन महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

) उपरोक्त बहूराष्ट्रीय कंपनीने निश्चित केलेली दूर्बल घटकांची वसतीस्थाने बुडितक्षेत्रात हमखास जातील अशा प्रकारे सिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्याचे काम जल संपदा विभागास देण्यात येत आहे. शासनाच्या या अभिनव योजनेचे नामकरण "आधी लगीन कोंढाणेचे" असे करण्यात येत आहे.

) "आधी लगीन कोंढाणेचे" या योजनेमूळे ज्या दूर्बल घटकांना आयुष्यभर पर्यटनाची अमूल्य संधी मिळेल त्यांना जल-पर्यटक () असे संबोधले जाईल.

) जल-पर्यटक () यांना सिंचित शेती पासून गंभीर धोका संभवतो असा अत्यंत गुप्त अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्या जल-पर्यटकांच्या हिताच्या दृष्टिने सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात जाण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. जल संधारण, विहिरी तसेच उपसा सिंचन योजनांपासूनही त्यांनी लांब रहावे अशा सूचना त्यांना देण्यात येत आहेत.

) जल-पर्यटक () यांना राज्यभर कोठेही सुखेनैव संचार करता यावा (मुद्दा क्र.४ च्या आधीन राहून) आणि कोठल्याही प्रकारचे प्रलोभन त्यांना कोणीही दाखवू नये आणि/अथवा त्यांनी त्या प्रलोभनास बळी पडून स्वत:चे नुकसान करून घेऊ नये म्हणून पुनर्वसन अधिनियम रद्द करण्यात येत आहे.

) "विस्थापित", "पुनर्वसन" या व तत्सम संज्ञा यापुढे असंसदीय मानण्यात येतील. त्यांचा कोठेही व कशाही प्रकारे उल्लेख करणे हा दखलपात्र तसेच अजामीनपात्र गुन्हा मानण्यात येईल.

) मुद्दा क्र.६ मधील उपरोक्त संज्ञा आणि/अथवा संकल्पनां आधारे साहित्य निर्मिती करण्यास राज्यात बंदी घालण्यात येत आहे. "बाई मी धरण धरण बांधते, माझे मरण मरण कांडते" या सारख्या चिथावणीखोर कविता, "झाडाझडती" सारख्या विपर्यस्त कादंब-या आणि तत्सम कोठलाही साहित्य प्रकार लिहिणे, प्रकाशित करणे, वाचणे यांस विकास विरोधी समजण्यात येईल. सुनियोजित व सर्वसमावेशक जल विकासास प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण पाहता नदी जोड प्रकल्पावर महा कादंबरी लिहिणा-यास मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष करण्यात येईल. शाल, श्रीफळ आणि वर्षभर पुरेल एवढी चितळेंची बाकरवडी व श्रीखंड देऊन त्यांचा शासनातर्फे विशेष सत्कार करण्यात येईल.

) "आधी लगीन कोंढाणेचे" या योजनेत सिंचन प्रकल्पांची निर्मिती व्हावी असे अपेक्षित असले तरी त्या प्रकल्पातील काही अथवा सर्व पाणी लगेच अथवा कधीही औद्योगिक विकासाकरिता, उद्योजकांच्या मनोरंजनाकरिता तसेच लवासा सारख्या शहरांकरिता राखीव ठेवण्याचा हक्क शासनास राहिल. त्याबाबत शासनाचा निर्णय अंतिम असेल व त्या विरूद्ध कोणत्याही न्यायालयात कोणालाही कधीही जाता येणार नाही.

) वरील मुद्दा क्र.८ मधील निर्णयामूळे बाधित झालेल्या कोणत्याही लाभधारक शेतक-यास/बागाईतदारास जल-पर्यटक () हा दर्जा देण्यात येईल. जल-पर्यटक () यांना प्रदान करण्यात आलेले सर्व हक्क जल-पर्यटक () यांनाही प्रदान करण्यात आले आहेत असे मानण्यात येईल. त्याकरिता स्वतंत्र अधिसूचना निर्गमित करण्यात येणार नाही.
१०) "आधी लगीन कोंढाणेचे" या योजनेचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याची जबाबदारी स्वायत्त जल प्राधिकरणाची असेल. त्यांनी दर तीन महिन्यांनी जल संपदा विभागास, दर सहा महिन्यांनी राज्यपाल महोदयांना आणि वर्षातून एकदा जागतिक बॅंकेस अहवाल सादर करणे बंधनकारक राहिल. स्वायत्त जल प्राधिकरणाच्या स्वायत्ततेचा शासन आदर करत असल्यामूळे विधान मंडळाला अहवाल द्यायचा किंवा असे याबाबत प्राधिकरणाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा.

११) कॅग, सी.बी.आय. आदि/तत्सम संस्थांना "आधी लगीन कोंढाणेचे" या योजनेची चौकशी करण्याचे अधिकार राहणार नाहीत.

१२) "आधी लगीन कोंढाणेचे" या योजनेचे महत्व लक्षात घेता आणि सुनियोजित व सर्वसमावेशक जल विकासाची निकड पाहता या योजने अंतर्गत निविदा काढणे, अधिसूचना निर्गमित करणे, इत्यादि प्रक्रिया व्यापक जनहितास्तव अंमलात न आणण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी करून शासनास त्वरित अनुपालन अहवाल सादर करावा असे आदेशित करण्यात येत आहे.

१३) "आधी लगीन कोंढाणेचे" या योजनेचे काम ९७ टक्के पूर्ण झाल्याची खात्री होताच हा शासन निर्णय व योजनेसंबंधीची सर्व कागदपत्रे अपघाताने आगीत जळून खाक होतील हे आवर्जून पाहिले जावे. आग सहज लागली असे दिसावे याकरिता योजनेच्या प्रारंभापासूनच विशेष कक्षाच्या योजनेचे काम मंत्रालयात हाती घेण्यात यावे.

१४) प्रस्तुत शासन निर्णय भविष्य़ात वादग्रस्त झाल्यास तो शासन निर्णय शासनाने कधीच निर्गमित केला नव्हता असे मानण्यात येईल.

मा.ना. अण्णा/भाऊ/दादा/काका/ताई यांचे नावाने व आदेशान्वये
< 
शासनाचे अवर सचिव
प्रत सर्व संबंधितांना दिली आहे असे गृहित धरण्यात येत आहे. तरीही लोकसहभाग, पारदर्शकता व जबाबदेही संदर्भातील शासनाचे पुरोगामी धोरण पाहता जल विकासाशी आपला संबंध आहे हे सिद्ध करणा-या कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस राज्यपाल महोदयांनी तशी विशेष अनुमती दिल्यास शासन निश्चित करेल ते शूल्क आकारून एक प्रत देण्यात येईल. जल पर्यटक () आणि () यांचेकरिता उक्त शूल्कात ५० टक्के सवलत देण्यात येईल. मात्र जल विकासाशी आपला संबंध आहे याबद्दल त्यांनी तसा संबंध आल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक, अथवा अनिवार्य अथवा दोन्ही किंवा दोन्ही पैकी जे लागू होईल ते, असेल.
[The way things are going on in water sector it would not be impossible if such a GR is really issued]

Saturday, July 21, 2012

सर्वसमावेशक विकास, पाणी व प्रसार माध्यमे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
वृत्तपत्रविद्या विभाग आयोजित चर्चासत्र
(दि.२० जूलै २०१२)
सर्वसमावेशक विकास, पाणी व प्रसार माध्यमे
- प्रदीप पुरंदरे(*)
.प्रास्ताविक:
    पाण्याविना सर्वसमावेशक विकास अशक्य आहे. पण पाणी योजनांच्या निर्मितीत व नंतर त्या राबवताना सर्वसमावेशक तत्वाचा अवलंब होतो का? दूर्बल घटक, दलित, आदिवासी, विस्थापित, कालव्याच्या शेपटाकडचे शेतकरी, छोटे व मध्यम भूधारक यांना त्यात कितपत स्थान असते? ते निर्णय प्रक्रियेत असतात का? -या अर्थाने "लाभधारक" असतात काराज्यस्तरीय सार्वजनिक सिंचन प्रकल्पांच्या प्रत्येक टप्प्यावर आज काय होते आहे व सर्वसमावेशक तत्वानुसार काय व्हायला हवे या बद्दल सूत्र रूपाने काही  मांडणी या लेखात संक्षिप्त स्वरूपात केली आहे. ती लक्षात घेता जल क्षेत्रात सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यात प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी जल क्षेत्रात नेमकेपणाने काय करावे याबद्दल काही विनंतीवजा सूचना लेखात शेवटी केल्या आहेत 
.नियोजन व संकल्पन
    अभियांत्रिकी निकषांना  न्याय देत तसेच एकूण सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय भान राखत प्रकल्पांचे नियोजन व संकल्पन व्हावे. तज्ञांचा सल्ला धुडकावून किंवा त्यांच्यावर दडपण आणून राजकारणापोटी खालील गोष्टी करणे सर्वसमावेशक विकासास बाधक ठरते.
() विशिष्ठ क्षेत्र मुद्दाम बुडवणे/ लाभक्षेत्रातून जाणीवपूर्वक वगळणे आणि विशिष्ठ क्षेत्रालाच फक्त लाभ मिळेल असे नियोजन करणे
() विस्थापितांचे पुनर्वसन प्रथम व व्यवस्थित पूर्ण न करता धरण बांधणे
() धरण पूर्ण करून जलसाठा करण्यास प्राधान्य देणे आणि कालव्यांची कामे करण्यात मात्र जाणीवपूर्वक उशीर करणे वा ती अर्धवट ठेवणे/सोडणे
() मागास विभागातील प्रकल्पांना पुरेसा निधी वेळेवर न देणे/योग्य ती कार्यालये (आवश्यक त्या कर्मचा-यांसकट) सुरू न करणे/आवश्यक त्या मंजू-या न देणे 
() बिगर सिंचन व उपसा सिंचनाचा योग्य तो विचार न करता प्रकल्पांची प्रथम आखणी करणे आणि कालांतराने शेतीचे पाणी फार मोठया प्रमाणावर बिगर सिंचन व उपसा सिंचनाला देणे वा त्या हेतूंकरिता होणा-या अनधिकृत पाणी वापराकडे जाणीवपूर्वक करणे
() कालव्यातील प्रवाहाचे नियमन व नियंत्रण करण्याकरिता सूयोग्य व्यवस्था न करणे
.बांधकाम:
    बांधकामातील भ्रष्टाचार आणि त्यामूळे होणारे निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामूळे कालव्यांच्या संकल्पित वहनक्षमता प्रत्यक्षात येत नाहीत. वहनव्यय प्रमाणाबाहेर वाढतात. कालवे वारंवार फुटतात. नादुरूस्त कालव्यांची दुरूस्ती होत नाही. परिणामी, पाणी कालव्यांवर शेवटपर्यंत पोहोचत नाही. टेलचे शेतकरी लाभक्षेत्रात असूनही पाण्यापासून वंचित राहतात
.व्यवस्थापन:
    पाणी वाटपात सर्वसमावेशकता व समन्याय प्रस्थापित होण्याकरिता सिंचन प्रकल्पांच्या व्यवस्थापनात खालील प्रक्रिया शासनाचे लिखित धोरण, कायदे व नियम, जी.आर. व परिपत्रके, तांत्रिक हस्तपुस्तिका या आधारे नित्यनेमाने प्रत्यक्षात होणे अपेक्षित असते.
() सिंचन-हंगामाचे तो हंगाम सुरू होण्यापूर्वी नियोजन करणे. प्राथमिक सिंचन कार्यक्रम करून या हंगामात किती पाणी उपलब्ध आहे, कोणत्या पिकांना ते मिळेल, एकूण किती पाणी-पाळ्या होतील, दोन पाणी-पाळ्यात किती दिवसांचे अंतर असेल हा तपशील शेतक-यांकरिता जाहीर करणे
() पाणी-अर्ज वेळेत मंजूर करून त्या आधारे पाणी वाटपाचे वेळापत्रक तयार करणे (कालवा सुरू होण्याची तारीख, कालवा चालू राहण्याचे दिवस, कोणाला कधी व किती वेळ पाणी मिळणार, प्रवाह किती असेल, इत्यादी) व ते अंमलात आणणे
() पाणी चोरी करणे, मध्येच घुसून पाणी घेणे, जास्त वेळ पाणी घेणे, इतरांना पाणी न मिळू देणे, पाणी-नाश करणे, इत्यादी प्रकारांना वेळीच प्रतिबंध करणे
() काटेकोर प्रवाह नियंत्रण व नियमन आणि विश्वासार्ह प्रवाहमापन करणे
() पिण्याचे पाणी, औद्योगिक वापराचे पाणी आणि शेतीचे पाणी प्रत्यक्ष देताना ते मंजूर नियोजनाप्रमाणेच देणे 
.देखभाल-दुरूस्ती:
     कालव्यांची देखभाल-दुरूस्ती नियमित व पुरेशी झाली तर खालील गोष्टी साध्य होतात
() कालव्यांची संकल्पित वहनक्षमता टिकून राहते. वहन व्यय मर्यादेत राह्तात. पाणी वाहण्याचा वेग अपेक्षे एवढा राहतो. पाणी सर्वत्र पोहोचते
() ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम पार पडतो. दोन पाणी-पाळ्यातील अंतर वाढत नाही. पिकांना त्यामूळे ताण बसत नाही. पिके जळत नाहीत.
वरील बाबी न झाल्यास मात्र त्याचा परिणाम टेलच्या शेतक-यांवर होतो. दूर्बल घटकांवर होतो. कारण त्यांच्या कडे विहिरी नसतात किंवा विजेचा/डिझेलचा खर्च त्यांना परवडत नाही. पर्यायी व्यवस्था करण्यास ते असमर्थ असतात. 
.पाणीपट्टी आकारणी व वसुली:
   देखभाल-दुरूस्तीचा खर्च पाणीपट्टीच्या वसुलीतून भागवला जाणे अपेक्षित असते. आकारणी अचूक न होणे, पाणी-बिले वेळेवर न देणे, वसूलीसाठी सक्षम यंत्रणा नसणे या सर्वामूळे पाणी-पट्टी वसुली फार कमी होते. मोठे बागायतदार पाणीपट्टीचे मोठे थकबाकीदार असतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. कमी वसुलीमूळे देखभाल-दुरूस्तीकरिता पुरेसा निधी मिळत नाही. एका दुष्टचक्राला सुरूवात होते.
.लोकसहभाग:
    जागरूक लोकसहभागामूळे सर्वसमावेशकता व समन्याय तत्वत: वाढीस लागू शकतो. मात्र अधिकारी व पुढारी दोघांनाही खराखुरा लोकसहभाग नको असतो. जाणीवजागृती नसल्यामूळे लोकही संघटीत नसतात. गावातल्या एकूण राजकारणामूळे ते पाण्यासाठी संघर्षही करू शकत नाहीत. पाणी वापर संस्था यशस्वी न होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे.
.कायदा:
   कायदे खूप केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. लाभधारक, अधिकारी व समाज कायद्यांबद्दल जागरूक नसतो. कायद्यांचा प्रचार व प्रसार होत नाही. १९७६ सालच्या पाटबंधारे कायद्याचे नियम अद्याप अस्तित्वात नाहीत ही वस्तुस्थिती काय दर्शवते?
.प्रसार माध्यमांची भूमिका:
    वरील सर्व मुद्दे लक्षात घेता प्रसार माध्यमे एक महत्वपूर्ण भूमिका निश्चित बजावू शकतात. त्याकरिता खालील सूचनांचा विचार व्हावा असे वाटते.
(१)      कृषि-पत्रकारितेच्या धर्तीवर आता जल-पत्रकारिता आवर्जून सुरू व्हायला हवी. जलक्षेत्राचा व त्यातही सिंचनाचा तपशील खूप वेगळा व मोठा आहे. तो समजावून घेण्याकरिता पत्रकारांना रितसर प्रशिक्षण द्यायला हवे. व्यावसायिक पद्धतीने जल-पत्रकारिता केल्यास फरक पडू शकतो. लाभक्षेत्रात आज त्याची गरज आहे. व्यवसाय म्हणून हे यशस्वी होऊ शकते. 
(२)     ग्रामीण भागातील प्रकल्पाचे पाणी वापरणा-या शेतकरी कुटुंबातील पत्रकारांनी जल-पत्रकारितेत लक्ष घातले तर लाभक्षेत्रात एक वेगळी सुरूवात होऊ शकते. लोकसहभाग, पारदर्शकता व जबाबदेही वाढु शकते.
(३)     सिंचन प्रकल्पांवर एका जागल्याच्या भूमिकेतून सतत लक्ष ठेवले जाणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमे ते उत्तम पद्धतीने करू शकतात. 
______________________________________________________________
(*) सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक (जल व्यवस्थापन), वाल्मी, औरंगाबाद   
दूरध्वनी: ०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४०
-मेल: pradeeppurandare@gmail.com
ब्लॉग: jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in

 [Presented in National Seminar on"Inclusive Growth & Mass Media", organised by Dept of Mass Communication & Journalism, Dr.BAMU, Aurangabad and Media for Change ( a Delhi based NGO) in Collaboration with Friedrich Ebert Stiftiung, Germany, 20-21 July 2012]

पाणीपट्टी आकारणी व वसुली


जल वास्तव-१०
पाणीपट्टी आकारणी व वसुली
महाराष्ट्रातील जल दर नव्याने निश्चित करण्याच्या प्रक्रियेबाबत या सदरात यापूर्वी (अंक-१३, ३ ते ९ मे २०१२) काही मांडणी करण्यात आली होती. त्या संदर्भात अजून काही मूलभूत मुद्दे या लेखात मांडले आहेत. पाणीपट्टी आकारणी व वसुली हा सर्व शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी यात लक्ष घातल्यास जल दर निश्चितीची प्रक्रिया जास्त चांगल्या प्रकारे होईल.

           महाराष्ट्रातील पुढील कायद्यांमुळे जल संपदा विभागास (जसंवि) पाणीपट्टी आकारणी व वसुलीबाबत कायदेशीर अधिकार "तत्वत:" प्राप्त झाले आहेत. () महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ () पाटबंधारे विकास महामंडळांचे पाच कायदे,१९९६ - ९८ () महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,२००५ () महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५. यापैकी एका कायद्याचा (क्र.) अपवाद वगळता कोणत्याही कायद्याचे नियम अद्याप तयार झालेले नाहीत. जुन्या/निरसित केलेल्या कायद्यांवर आधारित जुन्या नियमांआधारे काम चालू आहे.
          .पा..७६ कायद्यानुसार काढावयाच्या अधिसूचनांचे काम (नदीनाले, लाभक्षेत्र, उपसा योजना वगैरे) अद्याप सर्वत्र पूर्ण झालेले नाही. या कायद्यानुसार नेमलेले कालवा अधिकारी कोठेही कालवा अधिकारी म्हणून  काम करताना दिसत नाहीत. पाणीचोरी व पाणीनाश याबाबत गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण नगण्य आहे. न्यायालयाने म.पा..७६ आधारे काही निवाडा दिला अशी उदाहरणे मुद्दाम हुडकुनही फारशी सापडणार नाहीत. विविध पाणी वापर कर्त्यांबरोबर जे करारनामे जसंवि ने करायला पाहिजेत ते न करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. जेथे करारनामे झाले आहेत त्तेथे त्यांची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. हे सर्व पाहता म.पा..७६ची अंमलबजावणीच होत नाही हे कटू वास्तव आहे. त्या कायद्याचे अस्तित्व व अंमलबजावणी गृहित धरून नवीन कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या कायद्यांच्या अंमलबजावणीत असंख्य गंभीर कायदेशीर अडचणी व त्रुटी आहेत.
         वरील मुद्दे पाहता हे सूस्पष्ट आहे की पाणीपट्टी आकारणी व वसुलीचा (खरे तर एकूणच जल व्यवस्थापनाचा!) कायदेशीर पाया अत्यंत कमकुवत आहे. तो युद्धपातळीवर बळकट न करता त्यावर नवनवीन संकल्पनांचे इमले चढवणे राज्याकरता घातक ठरणार आहे. एका अभूतपूर्व कायदेशीर पेचप्रसंगाला जसंवि व मजनिप्रा आमंत्रण देत आहेत. पाणीपट्टी आकारणी व वसुलीच्या त्यांच्या अधिकारासच उद्या आव्हान दिले गेले तर सगळंच मुसळ केरात जाण्याची दाट शक्यता आहे. (या सदराच्या "विधिलिखित" या पहिल्या भागात आपण हा सर्व तपशील पाहिला आहे)
         इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पाणीपट्टीचे दर प्रथमपासून बरेच जास्त आहेत. त्यात वेळोवेळी लक्षणीय वाढही करण्यात आली आहे. काळाच्या ओघात पाणीपट्टीचे जे दर हळूहळू विकसित होत गेले त्यात नेमके काय चूक आहे हे अद्याप तरी कोणी व्यवस्थित मांडलेले नाही. त्या दरांबाबत पाणी वापर कर्त्यांनी फार मोठे आक्षेप घेतले आहेत असेही नाही. उलट, खरीप व रब्बी हंगामात कमी पाणी लागणारी भुसार पिके घेणा-या छोटया व मध्यम शेतक-याला ते दर परवडणारे आहेत. (जल दर नव्याने ठरवताना म..नि.प्रा.ने तेवढेच अथवा त्यापेक्षाही कमी दर निश्चित करण्याची हुशारी दाखवल्याने त्याबाबत वाद झाला नाही. पण त्यामूळे इतर महत्वाच्या मुद्यांनाही ख-या अर्थाने तोंड फुटले नाही. प्रश्न धसास लागला नाही.)
     पिक-क्षेत्र-हंगाम या आधारे वैयक्तिक स्तरावरील पाणीपट्टी आकारणी व वसुली या पद्धतीकडून सामुहिक स्तरावरील घनमापन पद्धतीकडे जाण्याचा मार्ग  खडतर आहे. त्याकरताची संक्रमणावस्था कदाचित कैक दशकांची सुद्धा असण्याची शक्यता आहे. -या अर्थाने कार्यरत व य़शस्वी पाणीवापर संस्था फार कमी आहेत. सर्व प्रकारच्या पाणीपट्टीची आकारणी अचूक व वेळेवर होत नाहीये. ती झाल्यास आकारणीत लक्षणीय वाढ करणे शक्य आहे. सिंचनाच्या पाणीपट्टी वसूलीची वार्षिक सरासरी टक्केवारी जेमतेम १३-१४% तर बिगर सिंचनाची फारतर ४०-४५% आहे. दोन्ही मिळून आज अंदाजे हजार कोटी रूपये थकबाकी आहे. असे असून सुद्धा शासनाच्या आकडेवारी देण्याच्या पद्धतीमुळे प्रचालन व देखभाल दुरुस्तीचा खर्च सध्याच्या वसुलीतून भागतो असे दिसते! (शासनाने प्रचालन व देखभाल दुरुस्तीकरता उपलब्ध करून दिलेला निधी व प्रत्यक्ष गरज यात फरक करायला हवा!!)
       पिकक्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी व पाण्याचे प्रत्यक्ष मोजमाप हा नियम नव्हे तर अपवाद आहे. त्यात नजिकच्या भविष्यात फार मोठे संख्यात्मक व गुणात्मक सकारात्मक बदल संभवत नाहीत. पाणी मोजण्याची सूयोग्य व विश्वासार्ह व्यवस्था नजिकच्या भविष्यात सर्वत्र बसवली जाणे हे काम आव्हानात्मक आहे. पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रक्रियेचे संगणकीकरण अद्याप दूर आहे. प्रशिक्षित व अनुभवी मोजणीदार, कालवा निरीक्षक, दफ्तर कारकून पुरेशा संख्येने नाहीत. त्यांचा सरासरी वयोगट ५० च्या पुढचा असण्याची शक्यता आहे. नवीन भरती झालेली मंडळी अजून तयार होता आहेत.
        दोन पाणीपाळ्यांपर्यंत हंगामाचा पूर्ण दर न लावता पाणीपाळीवार सवलतीचा स्वतंत्र  दर लावणे आणि थकबाकीची जबाबदारी प्रत्येक स्तरावरील अधिका-यांवर विभागणे या चांगल्या शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी म्हणावी तशी झालेली दिसत नाही. ३५ मीटरच्या आतील विहिरींवरील कायदेशीर पाझर पाणीपट्टी रद्द करून शासनाने स्वत:च्या उत्पन्नाचा एक स्त्रोत स्वत:च बंद केला आणि ऊसासारख्या पिकाला अजून प्रोत्साहन दिले. प्रवाही सिंचनाची अधिकृत मागणी या निर्णयामूळे अजून कमी होईल आणि आम्ही आमच्या विहिरीचे पाणी वापरतो, कालव्याचे नाही असे म्हणणा-यांची संख्या वाढेल.
          एकूण असे दिसते की पाणीपट्टी आकारणी व वसुलीच्या यंत्रणेस मूळात त्वरित सक्षम करण्याची नितांत गरज आहे. ते न करता पाणीपट्टीचे दर आधुनिक पद्धतीने ठरवण्यावर भर देणे व्यवहार्य होईल का आणि त्याप्रमाणे पाणीपट्टी आकारणी व वसुली सध्याच्या यंत्रणेमार्फत खरेच होऊ शकते का याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. पिक-क्षेत्र-हंगाम या आधारे प्रथम पाणीपट्टी ठरवून मग तीचे फक्त घनमापन दरात रूपांतर करायचे यास घनमापन पद्धतीची पाणीपट्टी म्हणणेही सैद्धांतिकदृष्टया योग्य नाहीपाणी वापराच्या प्रत्येक प्रकाराकरता आलेला प्रचालन व देखभाल दुरुस्तीचा खर्च भागिले त्या प्रकाराकरता वापरलेले पाणी याआधारेच फक्त घनमापन पद्धतीचा मूळ दर निश्चित करायला हवा. एकदा अशा प्रकारे मूळ दर ठरला की कोणाला किती दर लावायचा हे अन्य निकषां आधारे ठरवता येईल
          प्रचालन व देखभाल दुरुस्तीचा खर्च पाणीपट्टीच्या वसुलीतून कसा होईल हे फक्त पाहणे (आणि प्रकल्प सुस्थितीत राहतील याची खात्री करणे) ही मजनिप्रा ची कायदेशीर जबाबदारी आहे. हे प्रत्यक्ष घडवून आणताना कोणाला किती सवलत द्यायची, कोणाला जास्त दर लावायचा, शासनाने अन्य मार्गाने त्यातील किती वाटा उचलायचा हे जसंविचे/शासनाचे राजकीय निर्णय आहेत. मजनिप्रा व जसंवि च्या भूमिकांची गल्लत झाल्यास म..नि.प्रा.च्या स्वतंत्र कायद्याचा हेतू असफल ठरेल. मजनिप्रा प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या यंत्रणेचा भाग नाही. मजनिप्रा ने संनियंत्रण, मूल्यमापन व नियमन करायचे आहे. दैनंदिन अंमलबजावणीत मजनिप्रा ने भाग घेणे उचित नाही. अन्यथा, "योग्य ते अंतर न राखल्याने" मजनिप्रा स्वत:ची अर्ध-न्यायिक भूमिका प्रसंगी कठोरपणे व नि:पक्षपातीपणे पार पाडु शकणार नाही.
        वरील मुद्यांच्या पार्श्वभूमिवर पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रक्रिये संदर्भात खालील सूचनांचा विचार अगत्याने व्हावा असे वाटते:
) राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांना बहूउद्देशीय पायाभूत पाणी प्रकल्पांचा दर्जा देण्यात यावा. पायाभूत प्रकल्पांच्या पाणीपट्टी आकारणी व वसूलीचे निकष लक्षणीय शासकीय अनुदान गृहित धरूनच ठरवावेत.
) पिण्याचे/घरगुती वापराचे पाणी ही सामाजिक मूल्य (सोशल गुड) असलेली बाब मानण्यात यावी.
) औद्योगिक वापराचे पाणी ही आर्थिक मूल्य (इकॉनॉमिक गुड) असलेली बाब मानण्यात यावी. मात्र, "श्रीमंत" उद्योग व सर्वसाधारण उद्योग यात फरक करणे आवश्यक आहे. आपले सर्वसाधारण उद्योग हे आज उदारीकरण व जागतिकीकरणामूळे अडचणीत आहेत. त्यांची पाणीपट्टी प्रमाणाबाहेर वाढवणे उचित होणार नाही.
) चंगळवादी पाणी वापराचा मात्र वर्ग स्वतंत्र करून त्या वर्गाचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटचा ठेऊन त्यास जबर पाणीपट्टी लावणे आवश्यक आहे.
) राज्यातील पाण्यावर शासनाची मालकी असू नये. पाणी ही सामाईक मालकीची बाब मानली जावी. शासनाने विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करावे.
) पाणी वापर हक्क सामाईक पातळीवरच फक्त द्यावेत. ते वैयक्तिक पातळीवर देऊ नयेत.
) पाणी वापर हक्क हे ह्स्तांतरणीय व विक्रीयोग्य  असू नयेत.
) मुद्दा क्र. १ ते ७ चा समावेश रितसर कायद्यात करावा. त्याकरता सध्याच्या कायद्यात बदल करावेत.
) घनमापन पद्ध्तीने  पाणीपट्टी आकारणीचे दर वर नमूद केल्या प्रमाणे ठरवावेत.
१०) वितरिका, कालवा व प्रकल्पस्तरिय पाणी वापर संस्थांचे पाणीपट्टी आकारणीचे  दर निश्चित केले जावेत.
११) पिक-क्षेत्र व प्रवाह मापन यासाठीची आधुनिक (व न्यायालयात टिकेल अशी!) कार्यक्षम व्यवस्था प्राधान्याने निर्माण केली जावी.
१२) सध्याच्या पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रक्रियेत आणि यंत्रणेत सुधारणा करावी. तिचे बळकटीकरण करावे.
१३) पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रक्रियेचे संगणकीकरण ही काळाची गरज आहे. ते लवकर पूर्ण व्हावे.
१४) कायदा हे दुधारी शस्त्र असते. कायदा करून तो न वापरण्यावर अथवा चूकीच्या पद्धतीने वापरणा-यावरही ते उलटू शकते हे ध्यानात घेऊन सिंचन कायदेविषयक बाबींकडे जास्त गांभीर्याने पाहिले जावे. त्याकरता स्वतंत्र राज्यस्तरीय जलकायदे व सुशासन कक्ष असावा.
१५) पाणी प्रकल्प सुस्थितीत राहणे व सर्वांना पाणी व्यवस्थित मिळणे ही चांगल्या पाणीपट्टी आकारणी व वसुलीची पूर्वअट लवकर पूर्ण व्हावी.
१६) मजनिप्राच्या दृष्टिनिबंधावर फक्त अवलंबून न राहता तसेच पाणी व वीज यात मूलभूत फरक आहेत हे लक्षात घेऊन जसंविने पाणीपट्टी आकारणी व वसुली संदर्भात पर्यायी मांडणी करावी. जुन्या पाटबंधारे मंडळात व्यावहारिक अनुभवाचा प्रचंड साठा उपलब्ध आहे. तो वापरावा. सध्याच्या एकूण चर्चेत त्याचे पुरेसे प्रतिबिंब पडलेले नाही असे वाटते. पाश्चिमात्य संदर्भ-साहित्य आपल्या परिस्थितीत बहूतांशी उपयोगी पडणारे नाही.
[Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 19 to 25 July 2012]                                                           
     

Thursday, July 12, 2012

जल संकट: निवारण नव्हे, निर्मूलन हवे!


जल वास्तव-
जल संकट: निवारण नव्हे, निर्मूलन हवे!
१ जुलै ते ३० जून या कालावधीला महाराष्ट्रात सिंचन वर्ष असे म्हणतात. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत नवीन सिंचन वर्षाची सुरूवात झाली असेलसर्वत्र  सर्वदूर चांगल्या पावसाने सुरूवात होईल अशी आशा आहे. तसे झाले नाही तर मात्र एका मोठया जल संकटाला आपल्याला सामोरे जावे लागेल. शासन या जबरदस्त संस्थेची प्रचंड ताकत आणि संकटप्रसंगी एकदिलाने एकसाथ प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची महाराष्ट्राची परंपरा यामूळे जल संकटाचे निवारण करण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ यात शंका नाही. पण प्रश्न जल संकटाच्या निर्मूलनाचा आहे! त्याचे काय? ते होईल का? जल साठयांचे तळ उघडे पडले असताना सर्व अभिनिवेश जाणीवपूर्वक बाजूला ठेऊन आपण पाणीप्रश्नाच्या तळा-मूळाकडे एक समाज म्हणून जाणार का? अंतर्मूख होणार का? असे प्रश्न कोणाही संवेदनशील नागरिकांस पडणे स्वाभाविक आहे. त्यादृष्टिने या लेखात काही नवे-जूने मूद्दे परत एकदा मांडायचा प्रयत्न केला आहे. पाणीप्रश्नाचे अभ्यासक - चांगला पाऊस झाला तरी - त्यांचा गांभीर्याने एकत्रित विचार करतील अशी आशा आहे.
पाण्याचा प्रश्न हा सरळ जीवनशैलीच्या प्रश्नाशी येऊन भिडतो. उपलब्ध पाण्यात एक समृद्ध ऎहिक जीवन सर्वांच्या वाटयास यावे, समन्याय प्रस्तापित व्हावा आणि विनाश नव्हे विकास व्हावा हे स्वप्न साकार व्हायचे असेल तर पाण्याची गरज कमी व्हायला हवी. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान जनवादी भूमिकेतून वापरले गेले आणि पाणी विषयक सर्व प्रक्रियांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली तर विविध वापरांसाठी पाण्याच्या गरजा कमी करणे शक्य आहे. येथे धार्मिक आणि/अथवा अध्यात्मिक दृष्टिकोनातून गरजा कमी करणे असा अर्थ प्रस्तुत लेखकांस अभिप्रेत नाही हे आवर्जून नमूद केले पाहिजे. पाणी ही पवित्र अथवा व्यापारी वस्तु न मानता पूर्णत: ऎहिक दृष्टिकोनातून जीवन शक्य करणारे एक नैसर्गिक तत्व / पर्यावरणाचा अविभाज्य भाग म्हणून पाण्याकडे पाहता येते. किंबहुना, तसे पाहिले तरच पाणीप्रश्न सामोपचाराच्या मार्गाने व सुसंस्कृत पद्धतीने सुटेल. अन्यथा, पाणी हे विनाशकारी ही होऊ शकते याचा पुरावा  कधी काळी पाण्याआधारे विकसित झालेल्या व नंतर त्याच पाण्यामूळे विनाश पावलेल्या अनेक सभ्यतांमध्ये आपल्याला पहावयास मिळतो. या पार्श्वभूमिवर  खाली सूत्ररूपाने (विस्तारभयास्तव) फक्त काही महत्वाचे मूद्दे तेवढे मांडले आहेत.
) पिण्य़ासाठी, घरगुती वापरासाठी, औद्योगिक कारणांसाठी आणि "इतर" उद्देशांसाठी पाणी लागते. प्रकल्पाच्या नियोजनात तरतूद नसताना धार्मिक/सांस्कृतिक कारणांसाठी नदीत पाणी सोडणे हा "इतर" वापरातला एक प्रकार. कोणाच्याही श्रद्धांचा अवमान न करता संबंधितांना विश्वासात घेऊन हा प्रकार बंद केला जाणे आवश्यक आहे. विविध संत महात्म्यांचे तत्वज्ञान त्याकरिता पुरकच आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ऎनवेळी अमूक कालव्यातून अमूक नदी/नाल्यातच पाणी सोडा अशा राजकीय हट्टापोटी केलेल्या मागणीतून पाण्याचा (बहूतांशी गैर) वापर हे "इतर" पाणी वापराचे दुसरे नेहेमीचे उदाहरण. या प्रकारास शासनाने थारा देणे थांबवले पाहिजे. सन २०१०-११ साली बिगर सिंचनाकरिता जेवढे पाणी वापरले गेले त्यापैकी ३३टक्के पाणी (१९६० द...मी. म्हणजे ६९ टि.एम.सी.) "इतर" कारणांसाठी वापरले होते.
) पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी व नागरी भागातील व्यापारी हेतूंकरिताचे पाणी हे तीन स्वतंत्र प्रवर्ग यापुढे मानावेत. त्यांची पाणीपट्टी अनुक्रमे चढती असावी. या प्रवर्गांचे प्राधान्यक्रम वेगळे असावेत. पिण्याचे पाणी वगळता अन्य वापरात कायद्याने कपात करण्याची तरतूद असावी. सर्व प्रकारचा पाणी पुरवठा मोजमापावर आधारित असावा. त्यासाठी सूयोग्य व्यवस्था निर्माण करण्यात यावी. पाण्याचा कार्यक्षम वापर, फेरभरण, बचत व पुनर्वापर सहजसाध्य होईल असे संकल्पन, व्यवस्था/सुविधा व उपकरणे वापरणे बंधनकारक असावे.
) ठोक (बल्क) पाणी वापर करणा-या संस्थांचे शक्यतो स्वत:चे साठवण तलाव असावेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून ते विशिष्ट वेळापत्रकानुसार भरून देण्यात यावेत.
) उघडया कालव्यातून पाणी पुरवठा करणे टप्प्याटप्प्याने बंद करावे. भूमिगत पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करणे शक्य व्हावे म्हणून प्रोत्साहनात्मक योजनांसह समयबद्ध कार्यक्रम घेण्यात यावा. नवीन प्रकल्प/योजनात पाईपलाईनचा अंतर्भाव प्रथमपासूनच असावा.
) औद्योगिक वापरासाठी म..नि.प्रा.ने पाणी वापराचे निकष अलिकडेच निश्चित केले आहेत. त्यात उत्तरोत्तर सुधारणा व्हावी. विविध उद्योगांनी कमीत कमी प्रक्रिया-जल (प्रोसेस वॉटर) लागेल, त्याचा असंख्य वेळा पुनर्वापर करता येईल व या प्रक्रियेत जेवढा अपरिहार्य पाणीनाश होईल तेवढेच किमान पाणी (मेक-अप वॉटर) नव्याने घ्यावे लागेल असे तंत्रज्ञान त्वरित स्वीकारावे म्हणून खास कार्यक्रम हाती घ्यावेत. या करिता प्रोत्साहन व कायदेशीर बंधने दोन्ही असावे. (एका अभ्यासानुसार भारतातील सर्व औष्णिक वीज केंद्रांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरले तर २४ बिलियन घन मीटर पाण्याची बचत होऊ शकते. त्या पाण्यात संपूर्ण भारताची घरगुती पाणी वापराची गरज भागू शकते!) शेती करिता हॊणा-या पाणी वापराच्या तुलनेत औद्योगिक पाणी वापराची कार्यक्षमता चांगली आहे. पण जगातील विकसित देशांशी  तुलना करता आपल्या औद्योगिक पाणी वापराची कार्यक्षमता व पाण्याची उत्पादकता फार कमी आहे. श्रीमंत व सुशिक्षित औद्योगिक क्षेत्रात पाणी वापराबाबत सुधारणा करायला खूप मोठा वाव आहे. (औद्योगिक पाणी वापराची उत्पादकता भारतात फक्त ७.५ डॉलर्स प्रति घनमीटर आहे. स्विडन, कोरिया व ब्रिटन मध्ये मात्र ती अनुक्रमे ९२, ९६ आणि ४४४ डॉलर्स प्रति घनमीटर एवढी आहे.)
) ज्या उद्योगांना जास्त पाणी लागते असे जुनाट तंत्रज्ञानावर आधारित उद्योग परदेशातून भारतात स्थलांतरित होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यात यावी.
) ज्या उत्पादनांना/पिकांना जास्त पाणी लागते ती उत्पादने/पिके कटाक्षाने मर्यादित ठेवावीत. त्यांची निर्यात होऊ नये. कारण ती अप्रत्यक्षरित्या पाण्याचीच निर्यात असते.(व्हर्च्युअल वॉटर-आभासी पाणी असे त्याला म्हणतात.)
) सर्व सामान्य शेतक-यांस परवडेल अशा ठिबक सिंचनास प्रोत्साहन द्यावे. विजेचा वापर न करता उंचावर पाण्याने भरलेली बादली अथवा पिंप/ड्रम ठेऊन छोटया प्रमाणावर काही निवडक पिकांकरिता ठिबक सिंचन शक्य आहे. त्याची कार्यक्षमता नेहेमीच्या ठिबकपेक्षा कमी असली तरी अगदी मोकाट पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ते केव्हाही चांगले.
जनुकीय बदलां आधारे पिकांची पाण्याची गरज मूळातच कमी करण्याकरिता मोठया प्रमाणावर संशोधन सुरू करावे.
१०) पाणी टंचाई असलेल्या सिंचन प्रकल्पात अधिसूचना काढून नगदी व बारमाही पिकांना ठिबक सक्तीचे करण्या करिता म..नि.प्रा.कायद्यात २००५ सालीच तरतूद करण्यात आली आहे. ती अंमलात आणावी.
११) पाण्यासंदर्भात आजवर अनेक समित्या व आयोगांनी महत्वपूर्ण अहवाल दिले आहेत. शासनाने त्याबाबत निर्णय घ्यावेत व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
१२) जलक्षेत्रात कायदे, व्यवस्थापन व देखभाल-दुरूस्ती याकडे आजवर गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष झाले आहे. त्यात शासनाने युद्धपातळी वर लक्ष घालावे.
१३) वरील व तत्सम बाबींबाबत काही थोडीफार तरी प्रगती व्हावी असे शासनास खरेच वाटत असेल तर जल संपदा विभागाच्या दोन्ही सचिव पदांवर तसेच त्या विभागातील सचिव दर्जाच्या सर्व पदांवर शासनाने भारतीय प्रशासन सेवेतील (आय..एस.) अधिकारी तात्काळ नेमावेत आणि म..नि.प्राधिकरणाची पुनर्रचना करावी.(जल संपदा विभागात आज दोन सचिव आणि सात सचिव दर्जाचे अधिकारी आहेत!)
टिप: वरील मुद्दा क्र.५ मधील आकडेवारीचा संदर्भ- डाऊन टु अर्थ(जादाची पुरवणी), २९ फेब्रुवारी २००४सेंटर फॉर सायन्स अॅंड एनव्हिरॉनमेंट, नवी दिल्ली.

 [Published in Weekly "Aadhunik Kisan",Aurangabad,13 to 18 July 2012]

Tuesday, July 10, 2012

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा


मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
      (सहा कडवी: तीन अशी, तीन तशी)
                                                                          
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
जळली तत्वे, खाक मूल्ये
चवदार तळ्याचे पाणी आणा आणा आणा
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
जळतो शेतक-याचा आसूड
ज्योतिबाच्या हौदाचे पाणी आणा आणा आणा
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
संतांच्या भूमित स्त्री-भ्रूण हत्येचा वणवा
श्रीखंडयाची कावड रांजणाचे पाणी आणा आणा आणा
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा

?
??
???
????

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
शासनाची धोरणे जणू झेंडूची फुले
-हेचे पाणी आणा आणा आणा
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
चमकतो खंजीर आघाडीच्या धगीत
प्रितीसंगमाचे पाणी आणा आणा आणा
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
समित्यांच्या बाटल्या, आयोगांचे टॅंकर
रखडलेल्या प्रकल्पांचे पाणी आणा आणा आणा
मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा
!
!!
!!!
!!!!

- प्रदीप पुरंदरे
 (११ जूलै २०१२)