Thursday, April 30, 2015

जलक्षेत्रातील वाढता लोकसहभाग स्वागतार्ह

  
दुष्काळ ही एका अर्थाने इष्टापत्ती मानायला हवी अशा घटना गेली दोन-तीन वर्षे महाराष्ट्रात घडता आहेत. अनेक ठिकाणी अनेक जण स्वयंस्फूर्तीने पाण्याचे काम करता आहेत. तलावातील गाळ काढणे, नदीनाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करणे, साखळी बंधारे बांधणे, वर्षा जल संचय करणे आणि प्रदुषण नियंत्रण असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहेत. शासकीय मदत किंवा निधिची वाट न पाहता ही कामे होताना दिसत आहेत. बॅंका, ट्रस्ट, देवस्थाने अशा अनेक ठिकाणाहून पैसा उभा केला जात आहे. आपल्या गावात पाण्याची सोय व्हावी आणि त्यासाठी आपण काहीतरी करावे ही भावना वाढते आहे. काही यशोगाथात तर तन,मन व धन अर्पून लोक काम करता आहेत. जलसाक्षरतेचा टक्का वाढतो आहे. पाण्याबद्दल चर्चा होता आहेत. प्रसार माध्यमे त्याबाबत महत्वाची भूमिका बजावत आहेत. या सर्व बाबी अभिनंदनीय व अनुकरणीय आहेत. या लोकसहभागाने आता जलक्षेत्रातील ( वॉटर सेक्टर) इतर बाबींकडेही लक्ष घातले तर जास्त चांगले गुणात्मक बदल होतील. त्या हेतूने या छोटेखानी लेखात काही सूचना केल्या आहेत.

 भूजलाचा वापर सर्व प्रकारच्या अंदाजे १९ लाख  विहिरींद्वारे सध्या होत आहे. विकासाच्या या विकेंद्रित  स्वरूपामूळे भूजलाचा  फार मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित वापर होत आहे. तो कमी करण्यासाठी समाजाने आपणहून काही पथ्ये स्वीकारावीत असे प्रयत्न आता व्हायला हवेत. भूजल कायद्याबद्दल प्रबोधन होणे आवश्यक आहे. प्रत्येक शिवारात भौगालिक परिस्थितीनुसार विहिरींचे काही निकषां आधारे गट तयार करून पाण्याचा सामुदाईक वापर करता येईल का ही शक्यता तपासून पहायला हवी. अविनाश पोळ यांनी सातारा भागात  तर सोलापूरजवळ अंकोलीला अरूण देशपांडेनी वॉटर बॅंकचा प्रयोग केला आहे.

 पाणलोट क्षेत्र विकासाची (पाक्षेवि)  कामे रोजगार हमी योजनेतून करणे, पाक्षेविसाठी पुरेसा स्वतंत्र निधी न देणे, झालेल्या कामांचे आयुष्य संपणे , ती मूळातच एकात्मिक पद्धतीने न होणे, कामांचा दर्जा चांगला नसणे, माती अडवण्यापेक्षा "पाणी दिसण्या"ला प्राधान्य देणे, देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष होणे आणि पाक्षेवि संदर्भातील पथ्ये न पाळणे यामूळे पाक्षेविच्या सिंचनक्षम क्षेत्रापैकी खरेच उपयोगी / परिणामकारक क्षेत्र नक्की किती हा गंभीर चिंतेचा विषय आहेसकस, सक्षम व टिकावू पाक्षेवि, भूजलाचे पुनर्भरण, पुनर्भरणाच्या मर्यादेत भूजलाचा उपसा, मर्यादित उपश्याकरिता पिकरचनेची पथ्ये आणि एकूणच भूजल कायद्याची अंमलबजावणी हे सर्व होण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे स्थानिकस्तरावरील  एकूण ६५१९९ प्रकल्पांद्वारे १४.२० लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. पण या लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष किती क्षेत्र सध्या भिजते आहे याची विश्वासार्ह आकडेवारी कोठेही उपलब्ध नाही. तेथे  सिंचन व्यवस्थापन असा काही प्रकार होत नाही. त्यासाठी मूळी यंत्रणा व व्यवस्थाच नाही. बाष्पीभवन, गळती, पाझर व पाणीचोरी यापलिकडे तेथे काहीही होत नाही. गावोगावी असलेल्या या प्रकल्पांत स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करून या प्रकल्पांचा जीर्णोधार करायला हवा. देखभाल-दुरूस्ती व दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी पाणी वापर संस्थांनी घ्यायला हवी.

एकूण ३४५२ राज्यस्तरीय मोठया, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमूळे  अंदाजे ४८ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून  ७४९ सिंचन प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहेत. पूर्ण प्रकल्पांत लाभक्षेत्र विकासाची कामे झालीहंगामपूर्व जल नियोजन आणि पाणी वाटपा चे काटेकोर कार्यक्रम केले, कालवे, वितरिका व अन्य चा-या यांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दिले गेले आणि बांधकामाधीन प्रकल्पात प्रथम पासून लक्ष ठेवले  तर समन्यायी पाणी वाटप व कार्यक्षम वापर होण्याची शक्यता वाढेल. पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण त्यासाठी आवश्यक आहे. शासनाने अंग काढून घेतले आणि पाणी वापर संस्था यशस्वी होण्याचे प्रमाण फार कमी असल्यामूळे प्रकल्पाप्रकल्पात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी  तज्ञांच्या व्यावसायिक सल्लासेवा संस्थांची गरज आहे.  ताजा  व व्यावसायिक  दृष्टीकोन आणि नवे तंत्रज्ञान जलक्षेत्रात आल्यास पाणी-प्रश्नाला आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकू.
 [Article published in Lokmat, 1 May 2015]





Friday, April 3, 2015

जल व्यवस्थापन व जल-कायदे यांच्याकडे दुर्लक्ष: दुष्काळाला कायमस्वरूपी आमंत्रण



सध्या प्रसारमाध्यमातून राज्यात असलेल्या ‘पाणीबाणी’ संदर्भात खूप प्रकारे आकडेवारी देण्यात येते. विविध धरणात आज किती टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, मागील वर्षी आजच्या तुलनेत किती पाणीसाठा उपलब्ध होता, वगैरे माहिती सर्व साधारणत: दिली जाते. ती आवश्यक व महत्वाची तर आहेच, पण पुरेशी नाही. जलसंपदा विभागाने  हंगामवार प्रकल्पनिहाय केलेल्या पाण्याच्या मंजुर अंदाजपत्रकानुसार किती पाणीसाठा उपलब्ध असायला हवा ही माहिती त्यात नसते. धरणात साठणा-या पाण्याच्या वापराचे नियोजन करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूत्रे निश्चित केली आहेत. (एकत्रित शासन निर्णय क्र. संकीर्ण १०.०/ (१९/२०००) सिं.व्य. (धो) दि. ७.३.२००१) ती सूत्रे चांगली व उपयुक्त आहेत. त्यांना प्राथमिक सिंचन कार्यक्रम ( प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्राम - पी आय पी)  असे म्हटले जाते. पी आय पी संदर्भात शासनाने सर्व मुख्य अभियंत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातूनही (सी.डी.ए. १००४/ (३६५/२००४) लाक्षेवि (कामे) दि.२६.१०.२००४) शासनाचे धोरण सूस्पष्ट होते.  त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जलसंकटाला  जास्त सक्षमरित्या सामोरे जाता येईल. पण सर्वसाधारण अनुभव असा आहे की काही मोजके अपवाद वगळता बहुसंख्य सिंचन प्रकल्पात पी आय पी एक तर केलाच जात नाही किंवा उपरोक्त मार्गदर्शक सूत्रांनुसार प्रकल्पनिहाय स्थानिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन केला जात नाही. केलेला पी आय पी वरिष्ट अधिका-यांनी अभियांत्रिकी व कायदे विषयक बाबींआधारे तपासला, सुधारणांसह अधिकृतरित्या मंजुर केला आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणला असे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. सिंचन प्रकल्प जेवढा लहान तेवढी पी आय पी केला नसण्याची शक्यता जास्त. मंजुर पी आय पी आधारे राज्यस्तरावर माहिती संकलित करून शासनस्तरावर एकत्रित आढावा घेतला जात नाही असेही माहितीच्या अधिकारात मला मिळालेल्या माहितीवरून दिसते.

ज्या सिंचन प्रकल्पात सक्षम अधिका-यांनी मार्गदर्शक सूत्रे व अभियांत्रिकी बाबी विचारात घेऊन रब्बी (२०११-१२) व उन्हाळी (२०१२) या हंगामांचे पी आय पी अधिकृतरित्या मंजुर केले आहेत त्या मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची मुख्य नियंत्रक प्राधिकारीनिहाय यादी मला द्यावी अशी विनंती मी १३ एप्रिल २०१२ रोजी जलसंपदा विभागास  केली होती. त्या विभागाने दि.२५ एप्रिल २०१२ च्या पत्रान्वये मला दिलेले उत्तर पुढील प्रमाणे -"मागविण्यात आलेली माहिती विभागस्तरावर (मंत्रालयस्तरावर लाक्षेवि दलात) संकलित करण्यात येत नाही. सदर माहिती विभागाच्या अधिपत्याखालील सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित असल्याने आपण या माहिती करिता क्षेत्रीय कार्यालयास पत्र व्यवहार करणे आवश्यक आहे". हा सर्व प्रकार मी तत्कालिन जलसंपदा मंत्रीमहोदयांना पत्राद्वारे कळवला आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर तरी उपरोक्त माहिती राज्यस्तरावर संकलित करा, त्या  आधारे एकत्रित गंभीर आढावा घ्या आणि परिणामकारक उपाययोजना करा अशी विनंती केली. उत्तर अर्थातच आले नाही.  कार्यवाही काय झाली ते माहित नाही. मला आलेल्या शासन पत्रानुसार क्षेत्रिय अधिका-यांकडेही मी पाठपुरावा केला. त्यातून काय निष्पन्न झाले हा स्वतंत्र लेखाचा नव्हे तर लेखमालेचा विषय आहे.

वर नमूद केलेला तपशील जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असलेल्या राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांबाबतचा आहे. अडीचशे हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता असलेले प्रकल्प त्यात येतात. अडीचशे हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पांना लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) असे म्हणतात. त्यांची जबाबदारी  जिल्हा परिषद (शंभर हेक्टर पर्यंत) आणि जलसंधारण विभाग (१०१ ते २५० हेक्टर) यांचेकडे असते. आत्तापर्यंत ६४३९१लहान सिंचन योजना पूर्ण झाल्या असुन त्यांनी १५.५५ लाख हेक्टर इतकी  सिंचन क्षमता निर्माण केली आहे अशी माहिती केळकर समितीच्या अहवालात देण्यात आली आहे (प्रकरण १०: जलसंपत्तीचा विकास, पृष्ठ क्र.३२१). या हजारो छोट्या "बांधले व विसरले" स्वरुपाच्या  प्रकल्पात सिंचन व्यवस्थापन नेमके कसे केले जाते, पी आय पी केला जातो का आणि प्रत्यक्ष किती सिंचन होते याबद्दल  विश्वासार्ह सोडा वट्टात माहितीच उपलब्ध नाही. साठलेल्या पाण्यातून तेथे फक्त बाष्पीभवन, झिरपा,गळती व चोरी होते असे निदर्शनास आल्यास मला आच्छर्य वाटणार नाही. राज्याच्या जल विकास व व्यवस्थापनातील ही अंधारी जागा आहे. शासनाचे त्याबाबत आळीमिळी गुपचिळी हेच फक्त धोरण आहे असे दिसते. या हजारो योजना चक्क दुर्लक्षित असताना आता दिसेल तेथे शिरपूर पॅटर्न आणि वाट्टेल तेथे असंख्य साखळी बंधारे या उपक्रमातून आपण जल-गोंधळात भर तर घालत नाही ना अशी शंका येते. जलयुक्त शिवाराऎवजी "जलमुक्त" शिवाराकडे तर आपली वाटचाल नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण नदीखो-यात कोठेही प्रमाणाबाहेर पाणी अडवले आणि अविवेकी पद्धतीने वापरले की त्याचा विपरित परिणाम खाली कोठेतरी होणार हे उघड आहे.

जल व्यवस्थापनास कायद्याचे अधिष्ठान असावे व त्या आधारे पाण्याचे समन्यायी वाटप व कार्यक्षम वापर व्हावा असे सर्वसाधारणत: जगभर जलक्षेत्रात मानले जाते. नियम, पथ्य व संयम पाळणे हे जलक्षेत्रातल्या यशोगाथांचे गमक आहे.  ‘पुरोगामी’ महाराष्ट्रास असे कायद्याचे राज्य मान्य नाही! महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६, पाटबंधारे विकास महामंडळांचे (पाच) अधिनियम १९९६ ते १९९९, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अशा एकूण आठ कायद्यांना अद्याप नियम नाहीत. अधिसूचना, करारनामे इत्यादि न्यायिक प्रक्रिया विविध कायद्यान्वये अनेक प्रकल्पात अपूर्ण आहेत. टास्क फोर्स नेमून त्या सर्व प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करा असा आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी (राज्य जल परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष) दिला तरी काही होत नाही. जलसुशासनासाठी कायद्यात काही चांगल्या तरतुदी आहेत पण वर्षानुवर्षे त्याही कार्यान्वित केल्या जात नाहीत. विशिष्ट कालावधीत कायद्याचे नियम करा आणि जलसुशासनाच्या तरतुदी अंमलात आणा असा आदेश न्यायालयाने जल संपदा विभागास द्यावा याकरिता उच्च न्यायालयात  जनहित याचिका दाखल करण्याची पाळी यावी ही गोष्ट महाराष्ट्रास भूषणावह नाही.  जल व्यवस्थापन व जल-कायदे यांच्याकडे पराकोटीचे दुर्लक्ष करून महाराष्ट्र दुष्काळाला कायमस्वरूपी आमंत्रण देत आहे.

-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद

[Published in Divya Marathi, All editions, 4 April 2015 under different title]