Saturday, December 24, 2016

My original preface to Diwan's book "Pan - pasara"

प्रस्तावना

प्रा. विजय दिवाण यांच्या "पाणपसारा" या नवीन पुस्तकाची  प्रस्तावना लिहिताना मला विशेष आनंद होतो आहे.  दिवाण सरांसारख्या ज्येष्ठ क्रियाशील अभ्यासकाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे हा एकीकडे बहुमान आहे तर दुसरीकडे मोठी जबाबदारी. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण;  हवामान बदल आणि सर्वच स्तरांवर जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत सातत्याने होत असलेली जीवघेणी वाढ या व्यापक पार्श्वभूमिवर "पाणपसारा" येत आहे. राज्यातील व विशेषत: मराठवाड्यातील दुष्काळाचा दाहक संदर्भही त्याला आहे. माती, पाणी, उजेड, वारा हा सर्व  पसारा  समजाऊन घेत पाणी-प्रश्नाला  भिडणे हे एक फार मोठे आव्हान आहे. ते स्वीकारताना "पाणपसारा"ची निश्चितच मदत होणार आहे.

दिवाण सर हा एक आगळा वेगळा माणूस! ‘काव्य शास्त्र विनोदेन’ आणि ‘केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार’ या दोहोंचा एक सुरेख मिलाफ त्यांच्या अभिरूची संपन्न व्यक्तिमत्वात झाला आहे. औरंगाबादेतील खाम नदी, सलीम अली लेक, सिद्धार्थ उद्यान इत्यादिंचे संवर्धन व पुनरूज्जीवन  ते नर्मदा आंदोलनातील सक्रीय सहभाग, आणि दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रियल-कॉरिडॉर, मराठवाड्याचा पर्यावरण व पाणी विषयक  प्रश्न ते  देशोदेशींच्या वाईल्ड लाईफचा सजग अभ्यास एवढया मोठ्या पटावर दिवाण सर गेली अनेक दशके सातत्याने कार्यरत आहेत. सकारात्मक प्रयत्न आणि संघर्ष हे दोन्ही मार्ग ते लिलया अवलंबताना दिसतात. निसर्ग मित्र मंडळ, औरंगाबाद सामाजिक मंच आणि मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समिती अशा अनेक संस्थांमध्ये ते पुढाकार घेऊन काम करतात. मराठवाडा वैधानिक विकास मंडळात तज्ञ-सदस्य म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान केले आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या मार्गाने शहराच्या पाणी पुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचा एक मोठा प्रयत्न नुकताच केला. दिवाण सरांनी त्याविरूद्ध रान उठवले. शासन दरबारी पत्रव्यवहार केला.  वर्तमानपत्रातून असंख्य लेख लिहिले. वॉर्डावॉर्डात नागरिकांच्या शेकडो बैठका घेतल्या. खाजगीकरण विरोधी नागरिक कृती समिती स्थापन केली. शासनाला चौकशी समिती नेमायला भाग पाडले. पाण्याचा हक्क (राईट टू वॉटर) हा जीवनाच्या हक्काचा (राइट टू लिव्ह) भाग आहे आणि  नागरिकांना वाजवी पाणीपट्टी आकारून शुद्ध पाण्याचा पुरेसा व वेळेवर पुरवठा करणे ही महानगरपालिकेची घटनादत्त जबाबदारी आहे अशी  भूमिका घेत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या सर्वाच्या परिणामी, महानगरपालिकेला पाणी पुरवठ्याचे खाजगीकरण रद्द करावे लागले. लढा असमान होता. एकीकडे भ्रष्ट अधिकारी, मुजोर पुढारी आणि बेमुर्वतखोर ठेकेदार यांची अभद्र युती व आघाडी. तर दुसरीकडे, उदासीन जनता, स्वत:च्या कोशात रममाण झालेले बुद्धिजीवी,  व क्षीण जन संघटना ! पण दिवाण- ए -खास प्रयत्न यशस्वी ठरले. ‘मूर्ख म्हाता-याने डोंगर हलवला’! पीपीपीची पिपाणी बंद पाडण्याचे हे भारतातले पहिले उदाहरण. बदलत्या आर्थिक माहोल मधली ऎतिहासिक घटना! पण खेदाची गोष्ट अशी की, ना समाजाने त्याची दखल घेतली ना समन्यायी पाणी वाटपासाठी ‘संघर्षशील’ असणा-या जन संघटनांनी!

  पर्यावरण, जलनियोजन व जलविकास, मराठवाड्याचा पाणी-प्रश्न, पाण्याचे खाजगीकरण आणि  दुष्काळ अशा साधारण पाच विषयांवर गेल्या दहा वर्षात विविध वर्तमानपत्रांतून प्रकाशित झालेले एकूण ३५ लेख "पाणपसारा" त आहेत.  लोकाभिमुख व शास्त्रीय दृष्टीकोनातून केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आणि  सूस्पष्ट विश्लेषण हे या लेखांचे वैशिष्ठ्य आहे. "एका सर्वसामान्य वापरकर्त्याच्या भूमिकेतून" मते मांडली आहेत असे जरी दिवाण सर म्हणत असले तरी त्यांचे लिखाण त्याच्या फार पलिकडे जाणारे असून त्यात त्यांचा अभ्यास, व्यासंग आणि सामाजिक बांधिलकी पदोपदी जाणवते. पाण्याचे पर्यावरण-द्वेष्टे नियोजन व व्यवस्थापन, पाणी वाटपातील विषमता आणि पाण्याचा बाजार, आणि चंगळवादी व अकार्यक्षम वापर यावर दिवाण सरांनी कोरडे ओढले आहेत. मोठ्या धरणांना विरोध आणि लोकसह्भागावर आधारित पर्यावरण-स्नेही विकेंद्रित जलविकासाचा आग्रह हे त्यांच्या मांडणीचे मध्यवर्ती सूत्र आहे. त्यांच्या प्रतिपादनाचे मुख्य दुवे सूत्ररूपाने पुढील प्रमाणे आहेत. एक अनमोल नैसर्गिक वारसा (स्केअर्स नॅचरल हेरिटज), आणि  सामाजिक-मूल्य (सोशल गुड) असणारे सामाईक संसाधन (कॉमन पुल रिसोर्स)  म्हणून पाण्याकडे केवळ विश्वस्ताच्या (प्रिन्सिपल ऑफ पब्लिक ट्रस्ट )भूमिकेतून पाहिले पाहिजे. आपण पाण्याचे मालक नाही. सर्वांना किमान पिण्याचे व उपजिविकेपुरते तरी पाणी मिळण्याला पहिला अग्रक्रम हवा.  पाणी वाटपाचे अन्य अग्रक्रम प्रमाणशीर पद्धतीने ठरवले जावेत. पाण्याचे प्रदुषण रोखण्याकरिता कठोर उपाययोजना केली पाहिजे.  पाणी किती, केव्हा  व कशापद्धतीने मिळते (क्वालिटी ऑफ सर्व्हिस)  यावर अवलंबून असलेली पाणीपट्टी   सर्वसामान्यांना परवडणारी असावी.  पाणी-कारभाराची (वॉटर गव्हर्नन्स) व्यवस्था नेहेमी सतर्क व कार्यक्षम राहणे आवश्यक आहे. दिवाण सरांची अशी एकूण भूमिका ही केवळ जलवंचितांकरिताच नव्हे तर संपूर्ण समाजाकरिता महत्वाची आहे. पण त्याकडे आपले लक्ष नाही. या दुर्लक्षामुळे आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचे मोठे बोलके चित्र दिवाण सरांनी त्यांच्या तात्पर्य कथेत उभे केले आहे. वाचकांनी ते आवर्जून वाचावे. को जागर्ती? कोण जागे आहे?  हा त्यांचा प्रश्न निरुत्तर करणारा आहे.

महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात आज  अभूतपूर्व परिस्थिती  आहे. अनेक गंभीर पेच निर्माण झाले आहेत. हजारो सिंचन प्रकल्पांमुळॆ  लक्षावधी हेक्टर शेती, असंख्य ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजना, राज्यातील बहुसंख्य औद्योगिक वसाहती, जल व औष्णिक वीज केंद्रे यांना पाणी पुरवठा होतो आहे हे खरे असले तरी पराकोटीचा भ्रष्टाचार, अत्यंत निकृष्ट दर्जाची बांधकामे, प्रकल्पांच्या देखभाल-दुरूस्तीकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष, बेजबाबदार व्यवस्थापन, जलनीतीची चेष्टा व कायद्यांची खिलवाड ही  जलक्षेत्राची व्यवच्छेदक लक्षणे बनली आहेत. खुलेआम पाणी चोरी, बेबंद उपसा, अमाप पाझर / गळती / पाणीनाश सर्वदूर सुखेनैव होतो आहे. जल प्रदुषण भयावह गतीने वाढते आहे. पाणी वाटप व वापरातील अकार्यक्षमता आणि विषमता यामूळे तीव्र सामाजिक व राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत.

 विकासाचे जे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे (खाऊजा)  मॉडेल आपण स्वीकारले आहे त्याचे दुष्परिणाम सूस्पष्ट दिसत आहेत. पण ते नजिकच्या भविष्यात बदलले जाईल हे संभवत नाही. या धोरणामूळे जलक्षेत्रात नवनवीन संकल्पना व कायदे येत असले तरी जलक्षेत्रातील तंत्रज्ञान व व्यवस्थापन मात्र अद्याप जुनाटच आहे. जलक्षेत्रातील एकूण परिस्थिती सरंजामशाही थाटाची आहे. पाणीदार (जमीनदारच्या धर्तीवर) व पाणीचोर यांच्या ताब्यात सर्व व्यवस्था आहे. नवीन आर्थिक धोरणांमूळे जीवनाच्या इतर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ज्या प्रकारचे बदल काही अंशी झाले त्या मर्यादित अर्थानेही जलक्षेत्रात प्रगती झालेली नाही. एकविसाव्या शतकात अजुनही सिंचन व्यवस्थेचे साधे संगणीकरणसुद्धा झालेले नाही ही वस्तुस्थिती बोलकी आहे.   

 पाण्याची सार्वजनिक व्यवस्था एकीकडे आपल्या हितसंबंधांसाठी वाकवायची व हवी तशी वापरायची तर दुसरीकडे पाण्याच्या व्यापारीकरणातून जलस्त्रोतांवर कब्जा करायचा असा प्रकार सुरू आहेविस्थापित व पर्यावरण यांचा बळी देऊन अट्टाहासाने हाती घेतलेले प्रकल्प दशकानुदशके रखडले आहेत. प्रकल्पांच्या जलाशयावरील व कालव्याच्या वरच्या भागातील धनदांडगे अमाप पाणी वापरता आहेत. लाभक्षेत्रात असूनही टेलचे शेतकरी कोरडवाहूच राहिले आहेत. त्यांना पाणी मिळत नाही. लाभक्षेत्रातील जमीनी अ-कृषि होता आहेत. ज्या भागात पाणी आहे त्या भागातून अल्प-भूधारकांना हुसकावणे सुरु आहे. पाण्याचे केंद्रिकरण झाले आहे.  ‘भारताचे’ मुखंड पाणीदार बनले आहेत. पाणीदारीतून मिळालेल्या पैशातून ते शहरात व उद्योगात गुंतवणुक करत आहेत. एके काळचे ‘भारतवासी’ आता ‘इंडियावासी’ व्हायला लागले आहेत. हितसंबंध आता बदलता आहेत.भारताचे’ पाणी ‘इंडियाला’ गेले तरी आता चालू शकते. शेतीवरचा बोजा कमी व्हायला हवा हे मग साहजिकच पटायला लागते. अशा शेतक-यांच्या संघटना मग पाणी प्रश्नाबद्दल उस खाऊन गप्प बसतात.

अशी एकूण परिस्थिती असताना जल अभियंते आणि पर्यावरणवादी परस्पर विरोधी टोकाच्या भूमिका घेताना दिसतात. एकीकडे,  जल अभियंत्यांमध्ये बौद्धिक कुवत व अभियांत्रिकी कौशल्य असतानाही त्यांनी हवामान बदल, जागतिक तापमान वाढ व एकूणच पर्यावरण हे नवीन जगातले विषय अभ्यासायला नकार दिला आहे. नव्हे, त्या विषयाशी चक्क शत्रुत्व पत्करले आहे. त्यामूळे पर्यावरण पुरक जल विकास व व्यवस्थापन या अत्यावश्यक बाबीकडे त्यांचे गंभीर दूर्लक्ष झाले आहे. जलक्षेत्रात शोचनीय परिस्थिती  असतानाही नदीजोड प्रकल्प त्यांना शक्य कोटीतला वाटतो! तर दुसरीकडे,  जल विकास व व्यवस्थापन या संबंधी प्राप्त परिस्थितीचा तपशील समजावून न घेतल्यामूळे आणि आहे त्या परिस्थितीत  पाणी देण्याची ताबडतोबीची जबाबदारी  नसल्यामूळे  पर्यावरणवादी बांधुन पुर्ण झालेल्या प्रकल्पांच्या व्यवस्थापनाबाबत भूमिकाच घेत नाहीत. त्यात जनवादी / लोकवैज्ञानिक हस्तक्षेप करत नाहीत. उलट प्रकल्पांच्या डिकमिशनिंगची ( धरण काढून टाकणे) भूमिका घेतात. आणि तिसरीकडे, जलवंचित संघटीत नाहीत. पाणी मिळत नसले तरी ते काही बोलू शकत नाहीत. कारण पाणीचोर स्थानिक सत्ताधा-यांवर त्यांना अन्य कारणांसाठी अवलंबुन रहावे लागते. भावकी व जात यांचा ही प्रभाव असतो. शेतकरी व शेतमजुर यांच्या संघटना पाणी प्रश्नावर लढा उभारत नाहीत. पाण्याच्या समन्यायी वाटप व वापराची मागणी व कार्यक्रम घेत नाहीत. त्यामूळे प्रकल्प स्तरावर जनवादी व लोक वैज्ञानिक हस्तक्षेप होत नाही. शहरी भागात ही संघटीत वा असंघटीत कामगार पाण्यामूळे बेजार असले तरी पाणी प्रश्नाबाबत काही कृति करताना दिसत नाहीत. टेल विरूद्ध हेड, प्रवाही विरुद्ध उपसा, वरची विरूद्ध खालची धरणे, शहरी विरुद्ध ग्रामीण, सिंचन विरुद्ध बिगर सिंचन, विभागीय असमतोल अशा अनेक पाणी विषयक संघर्षात जलवंचितात फाटाफूट होते. विविध जल संघर्षात केवळ प्यादी वा मोहरे म्हणून त्यांचा वापर होतो. जलक्षेत्रातील सरंजामशाही विरूद्धचा ऎतिहासिक लढा उभारणे अशक्य होते. लाभक्षेत्रात पाण्यावरून असंतोष व टोकाच्या विसंगती असतानाही समन्यायी पाणी वाटप व वापर ही राजकीय मागणी होत नाही.

 पेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे खरे तर जलक्षेत्रातील एकत्र कुटुंबाचे सदस्य आहेत. जलक्षेत्रात निसर्गत:च एकत्र कुटुंब पद्धतीला पर्याय नाही. प्रत्येकाने स्वतंत्र राहतो म्हटले तर ते शक्य नाही. पण आजवर या कुटुंबात सिंचनदादाच्या मर्जीनुसार निर्णय झाले. पेयजल, भूजल, मृद व जलसंधारण आणि लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) ही मंडळी ‘गावाकडची अडाणी भावंडं’ ठरली. त्यांना दुय्यम वागणूक मिळाली. तर औद्योगिक पाणी वापर हा शहरात वा परदेशात स्थायिक झालेला पण शेतीच्या उत्पनाची आशा असणारा आणि म्हणून सिंचनदादाच्या कलाने घेणारा ‘हुशार भाऊ’ निघाला. सिंचनदादा मात्र तमाशाप्रधान मराठी सिनेमातल्या पाटलासारखा आपल्याच गुर्मीत वागत राहिला. कौटुंबिक जबाबदारीकडे पूर्ण दुर्लक्ष करुन उसावर दौलतजादा करण्यात त्याला नेहेमीच पुरूषार्थ वाटला.  या "कौटुंबिक" विसंवादास सामोरे जात लक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टि.एम.सी. पाणी आणि कोट्यावधी शहरी व ग्रामीण लाभधारक या भल्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा प्रपंच नेटका करण्यासाठी घरातील नवीन पिढीने आता सूत्रे हातात घेतली पाहिजेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित व्यवस्थापन, लोकाभिमुख जलनीती आणि समन्यायाचा आग्रह धरणारे काल-सुसंगत कायदे या आधारे बदल होऊ शकतात.  

पाण्याविषयी  गंभीर विवेचन करणा-या  मोजक्या दर्जेदार मराठी पुस्तकात "पाणपसारा" ही एक मोलाची भर आहे. "रहिमन पानी राखिए, पानीबिन सब सून" याची   महाराष्ट्राला आठवण करून देण्याची गरज होतीच.  दिवाण सरांचे त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. सिंचन प्रकल्पांमूळे विस्थापित झालेले जनसमूह, लाभक्षेत्रातील कोरडवाहू, शहरी व ग्रामीण गरीब, कष्टकरी व शेतकरी अशा सर्व जल वंचितांसाठी काही करू इच्छिणा-या कार्यकर्त्यांना "पाणपसारा"  नक्कीच उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो. अजून एक उत्तम पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल  ‘साकेत प्रकाशन’चे ही अभिनंदन.

-प्रदीप पुरंदरे
(१० डिसेंबर २०१६)
औरंगाबाद


Saturday, December 17, 2016

महाराष्ट्रातील जल नियोजन व जल व्यवस्थापन

वनराई वार्षिक विशेषांक, २०१६


१.० समष्टीचे भान व पर्यावरणीय अधिष्ठान नसलेला जलविकास:
जलक्षेत्राची व्याप्ती फार मोठी आहे. माती पाणी उजेड वारा या सा-या  पसा-यापासून त्याची सुरूवात होते. जल, जंगल, जमीन, नदीनाले, छोटे मोठे जलसाठे (वॉटर बॉडीज )  अशी  एकूण पारिस्थितीकीच तेथे कार्यरत असते. तिचा अभ्यास न करता, तिला गृहित धरून किंबहूना तिच्यावर आघात करत  सिंचन व बिगर सिंचन (पेयजल व घरगुती तसाच औद्योगिक पाणी वापर) या दोन्ही बाबी म्हणजेच जलक्षेत्र अशी निखळ उपयुक्ततावादी व्याख्या आपण केली. केवळ प्रकल्प उभारणी म्हणजे जलविकास हे समीकरण  स्वीकारले. समष्टीचे भान व पर्यावरणीय अधिष्ठान नसलेल्या या जलविकासाची तार्किक परिणिती एकीकडे दुष्काळात तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्यात होणे अपरिहार्य व अटळ होते. राज्याची जल-भीषण अवस्था मूलत: या चूकीच्या जल-धोरणांमुळे झाली आहे.  ही परिस्थिती सुधारायची असेल तर अंतर्मूख व्हावे लागेल. अभिनिवेश सोडावे लागतील. झालेल्या चूकांची प्रांजळ कबुली द्यावी लागेल. एकात्मिक जलविकासाची कास धरावी लागेल. अर्थात, हे सांगणे सोपे आहे; करून दाखवणे अवघड! कारण जलविकासाची पाटी कोरी नाही. पाटीवर दशकानुदशकांची गिचमिड मौजुद आहे. भूतकाळाचा हा वारसा नाकारता येत नाही.  काय आहे ती गिचमिड आणि भूतकाळाचा वारसा?

२.० जलविकासाच्या पाटीवरील गिचमिड:
 पर्यावरणाचा विचार न करता विहिरी, मृद व जल संधारण, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), कोल्हापुर पद्धतीचे बंधारे, उपसा सिंचन योजनाराज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठे सिंचन प्रकल्प आणि बिगर सिंचनाकरिता पाणी पुरवठा करणा-या योजना अशा अनेक  बाबी सुट्या सुट्या पद्धतीने आपण जलक्षेत्रात निर्माण केल्या आहेत. स्थळ,काळ,परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या या विविध प्रकारच्या जलविकासात विशिष्ट क्रम / प्राधान्य अपेक्षित आहे. हा क्रम केवळ भौगोलिक रचनेवर (माथा ते पायथा) आधारित नाही; कालानुक्रमालाही त्यात महत्व आहे. म्हणजे प्रथम माथ्याची कामे आणि शेवटी पायथ्याची कामे या अर्थाने. ही झाली थिअरी. पण प्रत्यक्षातला जलविकास असा झालेला नाही. क्रम बिघडला. सरमिसळ झाली. गुंतागुंत आहे.  त्यांच्या परस्पर संबंधांची दखल  आपल्या जलनियोजनात नाही. पण व्यवहारात त्या संबंधांचे बरे वाईट परिणाम हे होतच असतात. आपण त्याकडेही दुर्लक्ष करतो. त्यांचे ना दस्तावेजीकरण होते ना विश्लेषण. जल विकासाच्या प्रत्येक प्रकारात संबंधित शासकीय विभाग, अशासकीय संस्था आणि लाभधारक यांची अभेद्य संस्थांनं उभी राहिली आहेत. आपापल्या संस्थांनांचे हितसंबंध ही मंडळी वाट्टेल ते करून जपत असतात. त्यातून माहिती व आकडेवारी लपवणे आणि हेतूत: दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू होतात. आकडेवारी उपलब्धच नसणे किंवा असलेली विश्वासार्ह आकडेवारी नसणे हा प्रकार जलक्षेत्रात सर्वत्र व सर्वदूर आहे. त्यामूळे अभ्यास नीट होत नाहीत. निष्कर्ष चुकतात. एकात्मिक विकास करण्याकरिता जी प्रक्रिया व्हायला पाहिजे तीलाच खीळ बसते.

३.० जलक्षेत्रातील आरिष्ट:
‘महाराष्ट्राचे पाणी - एका दृष्टिक्षेपात’ या तक्त्यात पाण्याशी संबंधित काही मह्त्वाची माहिती संकलित केली आहे. तसेच अन्य दोन तक्त्यात ‘दरडोई आणि दर हेक्टरी नदीखोरेनिहाय तसेच प्रदेशनिहाय पाणी उपलब्धता’ दर्शवली आहे. तीन्ही तक्ते स्वयंस्पष्ट आहेत. त्यातून महाराष्ट्राच्या जलक्षेत्राचे एक व्यापक चित्र उभे राहते. पाऊसमानातील प्रदेशनिहाय विविधता, मासिक सरासरी पावसापेक्षा काही जिल्ह्यात मासिक सरासरी  बाष्पीभवन जास्त, नागपूर विभागाचा अपवाद वगळता अन्य विभागातल्या जंगलाखालील क्षेत्राचे  प्रमाण चिंताजनकरित्या कमी, जास्त भूजल उपसा असलेल्या तालुक्यांची लक्षणीय संख्या, पाणलोट क्षेत्र विकासातून नक्की किती क्षेत्र परिणामकारकरित्या सिंचनक्षम झाले याबद्दल साशंकता, बिगर सिंचन सातत्याने ‘बिगर’ होणे आणि सिंचन प्रकल्प नावाच्या तथाकथित भरवश्याच्या म्हशीला झालेला टोणगा हे आजचे चित्र आहे.  दरडोई आणि दर हेक्टरी नदीखोरेनिहाय तसेच प्रदेशनिहाय पाणी उपलब्धतेचे आकडे परिस्थितीची दाहकता दर्शवतात.  निकषांशी तुलना केली तर  येऊ घातलेल्या जल- आरिष्टाची कल्पना येते. प्रत्येक प्रदेशातील परिस्थिती गंभीर आहे. पण मराठवाड्यात ती भीषण आहे. ज्या विभागात दरडोई पाणी उपलब्धता  ५०० घनमीटर पेक्षा कमी असते  तर त्या विभागात विकासाचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. मराठवाड्यातील दरडोई पाणी उपलब्धता आज ४३८ घनमीटर आहे!

४.० हे होणारच होते:
जलक्षेत्रातील आपत्तीची चाहूल जाणकारांना पूर्वी पासूनच होती. आपत्ती उघडकीला यायला सिंचन घोटाळा हे निमित्त झाले. सन २०१२ पासून सततच्या जलसंकटामूळे पाणी प्रश्न ऎरणीवर आला. राज्यातील सत्तांतरामूळेही काही बदल झाले. आपत्तीमागच्या कारणांचा मागोवा घेतला तर असे वाटते की, हे तर होणारच होते. सूत्ररूपाने काही महत्वाचे मुद्दे पाहू.

४.१ जलक्षेत्रातील समान घटक:
जलविकासाचा प्रकार कोणताही असो जलक्षेत्रात अपुरे अन्वेषण, असमाधानकारक संकल्पना, दोषरहित बांधकाम, दुर्लक्षित देखभाल दुरूस्ती, व्यवस्थापनाचा अभाव,कमी पाणीपट्टी / नगण्य वसुली, पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभागाचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप हे दहा घटक समान आहेत.

४.२ जल व्यवस्थापन, कारभार व नियमनाचा अभाव:
भूजलाचे पुनर्भरण १२०० टिएमसी व २१ लाख विहिरीराज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांची निर्मित साठवण व सिंचन क्षमता अनुक्रमे ११८० टिएमसी आणि ८५ लक्ष हेक्टरबिगर सिंचनाकरिता ३४९१ संस्थांना २९८ टिएमसी पाणी पुरवठा   आणि पाणलोट क्षेत्र विकासाचे उपचारित क्षेत्र १२६ लक्ष हेक्टर या  जलक्षेत्राच्या व्याप्तीला साजेशा जल व्यवस्थापन, कारभार व नियमनाचा (जव्यकानी)  संपूर्ण अभाव हे जलक्षेत्राचे मूळ दुखणे आहे. सिंचन प्रकल्पांसंदर्भातला ‘जव्यकानी’ चा खालील आढावा बोलका नव्हे; आक्रोश करणारा आहे. (विस्तारभयास्तव येथे तपशील दिलेला नाही. लेखकाच्या ‘जागल्या’ या ब्लॉगवर तो उपलब्ध आहे)

१. जल व्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट): काही मोजक्या मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांचा अपवाद वगळता बहुसंख्य प्रकल्पात विहित पद्धतीनुसार पाण्याचे अंदाजपत्रक, पाणी वाटपाचा कार्यक्रम व अंमलबजावणी, पाण्याचे मोजमाप व  जललेखा, देखभाल दुरुस्ती, पाणीपट्टी आकारणी व वसुली, इत्यादि काहीही होत नाही. राज्यातील सिंचन हा एक अपघात आहे. इरिगेशन बाय एक्सिडेंट!

२. जल कारभार (वॉटर गव्हर्नन्स): अधिकारी व कर्मचारी यांची अपुरी संख्या, देखभाल-दुरूस्तीकरिता पुरेसा निधी वेळेवर मिळण्यात अडचणी, सिंचनविषयक कायदे उदंड पण नियमांचा अभाव, कायद्याला अभिप्रेत अधिसूचना व प्रक्रिया अर्धवट आणि कायदा अंमलात आणण्यासाठी  जबाबदेहीचा अभाव हे आजचे वास्तव आहे. अनागोंदी व अराजक ही विशेषणे कमी पडतील जल व्यवहार आहे.  कसे होणार जल-व्यवस्थापन?

३.जल नियमन ( वॉटर रेग्युलेशन): वाळू माफिया, टॅंकर माफिया, जे्सीबी पोकलेन माफिया, बाटलीबंद पाण्याचा अनिर्बंध व्यापार, इत्यादि  जल-शत्रूंनी जलक्षेत्रात अक्षरश: धुमाकुळ घातला असताना आणि  जल संघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत प्रचंड वाढ झाली असताना ऎन दुष्काळात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला  अध्यक्ष व  सदस्य नव्हते. आजही नाहीत. तीन अधिका-यांची समिती प्राधिकरणाचा कारभार सध्या पाहते आहे. ज्यांचे नियमन प्राधिकरणाने करायचे तेच प्राधिकरणाचे नियमन करता आहेत. अधिक काय बोलावे?

महाराष्ट्रातील जल नियोजन व जल व्यवस्थापनाची प्राप्त परिस्थिती ही अशी आहे आणि समाज मात्र गाफील आहे. एकविसाव्या शतकातलं ‘सोळावं वरिस’ राज्याला पाण्याच्या दृष्टीने धोक्याचं ठरणार आहे

*********
* सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद.
माजी तज्ञ-सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ
सध्या सदस्य, "एकात्मिक राज्य जल आराखडा" समिती
मो. ९८२२५६५२३२ pradeeppurandare@gmail.com







महाराष्ट्राचे पाणी - एका दृष्टिक्षेपात
अ.क्र.
तपशील
संख्या
सर्वसाधारण माहिती:

भौगोलिक क्षेत्र (लक्ष हेक्टर)
३०७.७
वहितीचे एकूण क्षेत्र
२०९.२५
एकूण वहिती खातेदार (लक्ष)
९४.७
वहितीचे सरासरी  खातेनिहाय क्षेत्र (हेक्टर)
२.२१
पर्जन्यमान (मिमी)
वार्षिक सर्वसाधारण
१३६०
प्रदेश निहाय सरासरी:
कोकण, विदर्भ, प. महाराष्ट्र, मराठवाडा

(३१६१), (११०६), (१०००),  (८२६)
सरासरी पर्जन्य दिवस: (एका दिवसात २.५मिमी किंवा जास्त )
राज्य, कोकण, विदर्भ, प.महाराष्ट्र,  मराठवाडा

(५९),  (९५),  (५५),  (५१)  (४६)
बाष्पीभवन (मिमी):
वार्षिक सरासरी बाष्पीभवन (मिमी):
कोकण, नाशिक-धुळे-जळगाव, बुलढाणा-अकोला-अमरावती, मराठवाडा
(१४७८), (२४७५), (२३६० ते २४२०), (१७७० ते २०३५)

मासिक सरासरी बाष्पीभवन हे मासिक सरासरी पर्जन्यमाना पेक्षाही जास्त:
नगर (जुलै महिना), जळगाव-बुलढाणा-अकोला (सप्टेंबर महिना)  / पावसाळ्यातही सिंचन आवश्यक!
कृषि - हवामान प्रदेश:
हवामान, झाडझाडोरा,उंचसखलपणा, मृद व पीकरचना या आधारे ९ प्रदेशात विभागणी
जंगल (लक्ष हेक्टर)
वनक्षेत्र म्हणून वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्र
६३.८ (२१%)
प्रत्यक्ष वनवृक्षाखालील क्षेत्र (दाट जंगल, विरळ जंगल)
४६.१४(२३.६, २२.४०)
एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत प्रत्यक्ष वनवृक्षाखालील क्षेत्र 
१५%
एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत दाट वनाचे क्षेत्र
८%
सर्वात जास्त जंगल
चंद्रपुर जिल्ह्यात - ५४%,
सर्वात कमी जंगल
उस्मानाबाद जिल्ह्यात - ०.०४%
वनक्षेत्राची प्रशासकीय विभागवार टक्केवारी
नागपुर, नाशिक, अमरावती, पुणे,  कोकण, औरंगाबाद

(४२), (१८), (१६),  (१०), (९),  (५),
पाण्याची उपलब्धता   (टिएमसी)
भूजल:
उपलब्धता (पूनर्भरण)

१२००
प्रदेशाच्या स्तरावर एकूण वापर (उपसा)
६००
वार्षिक उपलब्धतेच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त उपसा असलेले तालुके
  ८२ (२३%)  (.महाराष्ट्र - ५२, मराठवाडा -१४, विदर्भ -१६)
भूपृष्ठावरील पाणी
(एकूण नद्या: ३८०,  नद्यांची लांबी: १९२६९ किमी, नाल्यांची लांबी: १९३११ किमी)
एकूण उपलब्धता
५७१३
पाणी वापरायची मुभा
४४४८
पाणी साठयाची निर्मिती  (जून २०१० अखेरीस)
मोठे८६ ,मध्यम २५८, लघु  ३१०८, एकूण३४५२
११८०

पाणलोट क्षेत्र विकास  (लक्ष हेक्टर)
पाक्षेवि करिता एकूण उपलब्ध क्षेत्र
२४१
उपचारित क्षेत्र
१२६
सिंचनक्षम क्षेत्र  (उपचारित क्षेत्राच्या २५ %)
३१
प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र
???





सिंचन प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी होणारा पाणी पुरवठा (टिएमसी) केळकर समिती नुसार
औद्योगिक वापरासाठी
१२८
पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी
१७०
३१९१ संस्थांना एकूण
२९८
सिंचन क्षमता (लक्ष हेक्टर) एस आय टी अहवालानुसार

अंतिम
१२६
निर्मित
८४.६९
प्रत्यक्ष सिंचित
५३.२१





तक्ता - : दरडोई आणि दर हेक्टरी नदीखोरेनिहाय  पाणी उपलब्धता
                                                                                                   घनमीटर
नदीखोरे
दरडोई
निकष १७०० घनमीटर

दर हेक्टरी
सर्वसाधारण निकष ३००० घनमीटर
गोदावरी
८९०
२७१९
तापी
४७७
१४५१
नर्मदा
१९१३
४८१३
कृष्णा
८१८
३०८८
कोकण
३४९७
३७१३०
महाराष्ट्र
१५९६
५५८७


तक्ता - :  दरडोई आणि दर हेक्टरी प्रदेशनिहाय  पाणी उपलब्धता
                                                                                                     घनमीटर
प्रदेश
दरडोई
निकष १७०० घनमीटर
दर हेक्टरी

सर्वसाधारण निकष ३००० घनमीटर
उर्वरित महा.
१३४६
११७३
मराठवाडा
४३८
१३८३
विदर्भ
९८५
३६२७
महाराष्ट्र
११२१
५५८७