Showing posts with label MWRRA Act 2005. Show all posts
Showing posts with label MWRRA Act 2005. Show all posts

Saturday, April 14, 2012

(10) पाणी वापर हक्क





पाणी वापर हक्क
        शेतीला पाणी मिळणॆ ही शेतक-यांसाठी किती महत्वाची गोष्ट! पाण्याचा आधार शेतीला मिळाला की सगळेच कसे बदलून जाते!! ओलावा, गारवा, हिरवळ आणि त्यातून येणारी समृद्धी कोरडवाहू शेतक-यांचे जीवनच बदलून टाकते. पाण्यासाठी जीव टाकतो शेतकरी. प्रसंगी जीव देतोही! अशा परिस्थितीत जर शासनाने पाणी वापर हक्क देऊ केले आणि कायद्याने पाण्याची हमी देतो म्हटले तर? स्वप्नात असल्यासारखे वाटेल! शासनाने २००५ साली केलेल्या सिंचन विषयक दोन नवीन कायद्यांनी नेमकी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
          महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अन्वये काही विशिष्ट राज्यस्तरिय सिंचन प्रकल्पात शेतीकरिता पाणी वापर हक्क देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत (..सु.प्र.) निवडलेल्या २८६ प्रकल्पांना ते तत्वत: लागू होऊ शकतात. महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन नियम, २००६च्या जोडपत्र -५ मध्ये शेतीकरिता देऊ करण्यात आलेल्या पाणी वापर हक्कांचा सर्व तपशील उपलब्ध आहे. पाणी वापर संस्थांसाठी पाणी वापर हक्क निश्चित करणे, ते जाहीर करणे, प्रत्यक्षात देणे, ते खरेच मिळता आहेत याची खात्री करणे आणि मिळत नसतील तर वेळीच हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करणे याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (..नि.प्रा.) त्यांच्या कायद्यान्वये खालील दोन महत्वाचे दस्तावेज तयार केले आहेत.
              () पाटबंधारे प्रकल्पातून ( पथदर्शी तत्वावर) पाणी वापर हक्काचे निश्चितीकरण, विनियमन आणि अंमलबजावणी यासाठीची तांत्रिक संहिता, जानेवारी २००८
              () हक्कदारीचे विनियम व अंमलबजावणीची कार्यपद्धती- विनियमकाचे अधिकार व कार्ये आणि ज.सं.वि. च्या अधिका-यांची जबाबदारी, ऑक्टोबर २००७
          या दस्तावेजांआधारे म..नि.प्रा. आणि वाल्मी यांनी संयुक्तरित्या गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत. त्या कार्यशाळांत ज.सं.वि. चे अधिकारी व पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांना कायदा व नियमाची पुस्तके आणि वरील दोन दस्तावेज देण्यात आले आहेत. प्रस्तुत लेखक या सर्व प्रक्रियेत प्रथम पासून १ ऑक्टोबर २०११ पर्यंत प्रत्यक्ष सहभागी होता. त्यात आलेल्या अनुभवा आधारेच येथे मांडणी करण्यात येत आहे. प्रथम पाणी वापर हक्क ही संकल्पना व त्यासाठीची योजना काय आहे हे समजावून घेऊ.
           सर्वसामान्य पावसाच्या वर्षात, प्रकल्पाचा जलाशय़ पूर्ण भरला तर, सिंचना करिता हंगामवार "विहित पाणी वापर हक्क" (घन मीटर प्रति हेक्टर) काय असेल हे प्रथम त्या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रस्तावित करतील. ..नि.प्रा.तो प्रस्ताव तपासेल. जरूर तर त्यात सुधारणा करून रितसर हक्कदारीचा आदेश काढेल. त्या आदेशानुसार संबंधित कार्यकारी अभियंता आपल्या प्रकल्पातील पाणी वापर संस्थांचा हंगामनिहाय "मंजूर पाणी वापर हक्क"(सहस्त्र घनमीटर) जाहीर करतील. साधारणत: पुढील तीन वर्षांकरिता तो लागू राहिल.
           "मंजूर पाणी वापर हक्क"(सहस्त्र घनमीटर) हा सर्वसामान्य पावसाच्या वर्षातला, जलाशय़ पूर्ण भरला असेल तरचा, आदर्श पाणी वापर हक्क आहे. प्रत्यक्षात दरवर्षी जलाशय कदाचित पूर्ण भरणार नाही.तुटीच्या वर्षात बिगर सिंचनाचे पाणी विचारात घेऊन "देय पाणी वापर हक्क"(सहस्त्र घनमीटर) हंगामवार नव्याने ठरवावा लागेल. पाण्याच्या उपलब्धतेनुसार देय पाणी वापर हक्क हा मंजूर पाणी वापर हक्काच्या काही टक्के असेल. तो टक्का नक्की किती ते कार्यकारी अभियंता दर हंगामापूर्वी जाहीर करतील. अशा रितीने घोषित झालेल्या देय पाणी वापराचा हक्क पाणी वापर संस्थांना प्रत्यक्षात देण्यास कार्यकारी अभियंता कायद्याने जबाबदार असतील. ही  संकल्पना जल संपदा विभाग अंमलात आणतो की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी म..नि.प्रा.ने विनियामक (रेग्युलेटर्स) आणि प्राथमिक विवाद निवारण अधिकारी (पी.डी.आर..) नेमले असून त्याची एक यंत्रणा व कार्यपद्धती निर्माण केली आहे.
          ..सु.प्र.अंतर्गत निवडलेल्या पथदर्शी प्रकल्पांमध्ये शासनाने विनियामक नेमले आहेत. ते म..नि.प्रा.च्या नियंत्रणाखाली असतील व त्या प्राधिकरणाच्या आदेशानुसार काम करतील. मोठया व मध्यम प्रकल्पांत उप अभियंते तर लघु प्रकल्पात शाखाधिकारी विनियामक असतील. हे विनियामक ज.सं.वि.चे असले तरी, जेथे विनियामक म्हणून काम करायचे, त्या प्रकल्पातील नसतील. शेजारच्या दुस-या एखाद्या प्रकल्पावरील असतील. दर हंगामाअगोदर त्यांना त्या हंगामाचा देय पाणी वापर हक्क कळविला जाईल. हंगामाचा सिंचन कार्यक्रम ही त्यांना दिला जाईल. विनियामकांचे काम असे की, त्यांनी दर पाणी-पाळीत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करायची. निश्चित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पाणी वापर संस्थांना देय हक्काचे पाणी मिळते की नाही हे तपासायचे. विहित नमून्यात नोंदी करायच्या. त्रुटी आढळल्यास संबंधितांना उचित सूचना द्यायच्या. दर पाणी-पाळी नंतर सरळ म..नि.प्रा.ला लेखी अहवाल द्यायचा. भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास तो सोडवताना पार पाडावयाच्या अर्ध-न्यायिक प्रक्रियेत विनियामकाचा अहवाल हा एक महत्वाचा दस्तावेज मानला जाईल.
         शासनाने मोठया, मध्यम व लघु प्रकल्पांकरिता अनुक्रमे सिंचनाशी संबंधित मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना प्राथमिक विवाद निवारण अधिकारी म्हणून नेमले आहे. एखाद्या पाणी वापर संस्थेला पाणी मिळाले नाही, कमी मिळाले किंवा उशीरा मिळाले तर ती संस्था आता प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांचेकडे रितसर फिर्याद करू शकते. दाद मागू शकते. प्राथमिक विवाद निवारण अधिकारी जाहीर सुनावणीच्या माध्यमातून विवाद निवारण करू शकतात.
          ही एकूण योजना एखादा अपवाद वगळता अद्याप फारशी यशस्वी झालेली नाहीविनियामक आणि प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांच्याबरोबर कार्यशाळेच्या निमित्ताने प्रस्तुत लेखकाच्या अनेक वेळा औपचारिक/अनौपचारिक चर्चा झाल्या. पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद झाला. या सर्वांनी कार्यशाळेतही जाहीर मत प्रदर्शन केले. वाल्मीच्या कामाचा एक भाग म्हणून प्रस्तुत लेखकाने काही प्रकल्पांना भेटी दिल्या. अहवाल अभ्यासले. या सर्वा आधारे खालील निरीक्षणे केली आहेत. त्याबद्दल खुली चर्चा होणे आवश्यक आहे.
() पाणी वापर हक्कांचा हा प्रयोग म..नि.प्रा. आणि वाल्मीने पुढाकार घेऊन गांभीर्याने व उत्साहाने राबवण्याचा प्रयत्न केला. पण जल संपदा विभागाचा प्रतिसाद तुलनेने थंडा होता.
() ..सु.प्र.अंतर्गत जी पुनर्स्थापनेची कामे झाली ती अपेक्षित दर्जाने व वेगाने झालेली नाहीत. मातीकामांना प्राधान्य दिले गेले. शिर्ष नियंत्रक व प्रवाह मापकांच्या कामांना जेवढे महत्व व प्राथमिकता द्यायला हवी होती ती दिली गेली नाही.त्यामूळे कार्यक्षम प्रवाह नियंत्रण/नियमन आणि विश्वासार्ह प्रवाहमापन हा पाणी वापर हक्कांचा पायाच कमकुवत राहिला आहे.
() देय पाणी वापर हक्क खरेच द्यायचे असतील तर मूळात पाण्याचे अंदाजपत्रक (पी.आय.पी.) आणि पाणी-पाळ्यांचे नियोजन व्यवस्थित व्हायला हवे. ते बहुतांशी प्रकल्पात होत नाही. त्याचे संनियंत्रण व मूल्यमापन म..नि.प्रा. करत नाही. .सं.वि. ते करेल असे गृहित धरले गेले आहे. ..नि.प्रा. एकूण प्रकल्पाच्या जल व्यवस्थापनाबाबत भूमिका घेत नाही. निवडक पाणी वापर संस्थांपुरतेच लक्ष केंद्रित केल्यामूळे समष्टीकडे दूर्लक्ष झाले आहे. ही एकूण प्रयोगातील कमकुवत कडी (विकेस्ट लिंक) आहे
()विनियामक आणि प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांना कोणत्याही लाभाविना त्यांच्यावर सोपवलेली जादाची जबाबदारी (ती ही कायदेशीर! म्हणजे संभाव्यत: भानगडीची!!) नकोशी वाटते. खरे अहवाल देणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणीही खूप आहेत. त्या वारंवार मांडू्नही सुटत नाहीत.
() पाणी वापर हक्क ही  संकल्पना राबविण्याकरिता जी मानसिकता हवी तीचा अभाव सर्वत्र सर्वदूर आहे.पाणी वापर संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारीही आज त्याला अपवाद नाहीतत्यांच्या क्षमतावृद्धी करिता मोठा पैसा देऊन खास नेमलेल्या अशासकीय संस्था एखादा अपवाद वगळता त्या बाबत अपयशी ठरल्या आहेत असे बहुतांशी अधिका-यांना वाटते.
() राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व समन्यायी पाणी वाटपाबद्दल आग्रही असणा-या अशासकीय संघटना यांनी या प्रयोगाबाबत अजून तपशीलवार भूमिका घेतलेल्या नाहीत. म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. कृति केलेली नाही. जलदर निश्चित करण्याच्या प्रक्रियेतला जाणीवपूर्वक लोकसहभाग पाणी वापर हक्कांच्या बाबतीत मात्र दिसत नाही. खरेतर पाणी वापर हक्क जास्त मूलभूत व महत्वाचे आहेत.
 () विनियमकांनी म..नि.प्रा.ला सादर केलेल्या अहवालांचे तसेच प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांनी केलेल्या विवाद निवारणांचे (किंबहुना, या एकूण प्रयोगाचेच!) सखोल, समग्र व गंभीर विश्लेषण ति-हाईत संस्थेमार्फत अद्याप झालेले नाही.
(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[२६एप्रिल ते २मे २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)

(9) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (म.ज.नि.प्रा.२००५): महत्वाच्या तरतुदी


  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (..नि.प्रा.२००५)
महत्वाच्या तरतुदी:
        ..नि.प्रा.कायद्यात एकूण ३२ तरतुदी आहेत. सर्व तरतुदींची चर्चा येथे शक्य नाही. आवश्यकही नाही. अगदी महत्वाच्या तरतुदी तेवढया आपण येथे पाहू. राज्याच्या जलनीतीनुसार जलक्षेत्राची पुनर्रचना करण्याकरिता मुद्दाम कायदा करून राज्य जल मंडळ व राज्य जल परिषद ही दोन नवीन व्यासपीठे शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अस्तित्वात आली. पण सात वर्षे झाली तरी ती अद्याप कार्यरत नाहीत. एकात्मिकृत राज्य जल आराखडा कायदा अंमलात आल्यापासून सहा महिन्यात तयार करायचा होता. तोही अजून उपलब्ध नाही. हा तपशील आपण यापूर्वी या सदरात पाहिला आहे. नदी-खोरे अभिकरणांबाबतही अशीच रड चालू आहे.
        नदी-खोरे अभिकरण ही एक व्यापक संकल्पना आहे. सर्व पाणी वापरकर्त्यांना त्यात प्रतिनिधित्व द्यायला हवे. सर्व प्रकारच्या पाणी वापराचा नदी-खोरे पातळीवर साकल्याने व समग्रतेने विचार अशा अभिकरणात व्हावा अशी अपेक्षा असते. या अर्थाने आज आपल्याकडे नदी-खोरे अभिकरणे नाहीत. ..नि.प्रा. कायद्याने शॉर्टकट घेतला आहे. प्रस्थापित पाटबंधारे विकास महामंडळांनाच कायदा (कलम क्र. ()()) नदी-खोरे अभिकरण असे संबोधतो. या तथाकथित नदी-खोरे अभिकरणांनी विविध पाणी वापरकर्त्यांना पाणी वापर हक्क द्यावेत असे कायद्यात (कलम क्र.११ ते १४) म्हटले आहे. आता तपशीलाचा भाग असा की, या नदी-खोरे अभिकरणांकडे म्हणजेच मूळातल्या महामंडळांकडे जल व्यवस्थापनाचे कामच नाही. जल व्यवस्थापन अद्याप शासनाकडेच आहे. महामंडळे प्रामुख्याने फक्त बांधकामच करतात. त्यामूळे सात वर्षे झाली तरी नदी-खोरे अभिकरणांनी पाणी वापर हक्कांबाबत अजून काहीही केलेले दिसत नाही. कलम क्र.१४ अन्वये खरेतर ८ जून २००५ पासून  नदी-खोरे अभिकरणांकडून पाण्याचे हक्क मिळविल्याशिवाय कोणताही पाणी वापर कायदेशीर ठरत नाही. म्हणजेच नदी-खोरे अभिकरणांनी पाणी वापर हक्क न दिल्यामूळे ८ जून २००५ पासूनचा सर्व पाणी वापर चक्क बेकायदा ठरतो! जल संपदा विभागाला याबाबत २०११ साली जाग आली. शेवटी शासनच ते! शासनाला सगळे कसे "सोप्पंसोप्पं" असते. शासनाने कायद्यातच सुधारणा केली. "कलम ११ अन्वये पाणी वापराच्या हक्कांचे वितरण निर्धारित केल्यानंतर आणि पाण्याची हक्कदारी देण्याचे निकष निर्धारित केल्यानंतरच केवळ, या कलमान्वये पाण्याची हक्कदारी आवश्यक असेल". ही सुधारणा केली १७ सप्टेंबर २०१० रोजी पण त्यात म्हटले की ती सुधारणा दि.८ जून २००५ रोजी अंमलात आली असे मानण्यात येईल. सुटला प्रश्न! आहे काय न नाही काय? सगळे कसे कायदेशीर! खेळ सुरु झाल्यावर ५-६ वर्षांनी खेळाचे नियम बदलायचे आणि हरलेल्याला आता पूर्वलक्षी पद्धतीने विजयी घोषित करायचे असा हा प्रकार आहे. फुले, आंबेडकर, शाहूमहाराजांच्या सोडा य़शवंतरावांच्या महाराष्ट्रात हे व्हावे?
         हीच "सोप्पी पद्धत" वापरून शासनाने म..नि.प्रा.चे पाणी वापर हक्क निश्चित करण्याचे अधिकार एका झटक्यात कमी करून टाकले. किंबहुना, पाणी वापर हक्क या संकल्पनेच्या अंमलबजावणीची व्याप्तीच मर्यादित करून टाकली. त्याचा तपशील सूत्ररूपाने खालील प्रमाणे:
() "क्षेत्रीय वाटप" ही व्याख्या कायद्यात नव्याने घालण्यात आली(कलम २.()(-). "त्याचा अर्थ, राज्य शासनाने, जलसंपत्ती प्रकल्पामध्ये वापराच्या विविध प्रवर्गांना केलेले वाटप, असा आहे". मतितार्थ असा की बिगर सिंचनाला किती पाणी द्यायचे हे शासन ठरविणार; ..नि.प्रा. नाही.
()"पाण्याची हक्कदारी" ही संज्ञा (कलम ३१क), "महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-याकडून व्यवस्थापन अधिनियम,२००५ अन्वये कार्यक्षेत्र निश्चित करण्यासह ज्या क्षेत्रामध्ये संबद्ध तरतुदींचे अनुपालन केले असेल अशा क्षेत्रांनाच फक्त लागू होईल" असा बदल कायद्यात करण्यात आला. याचा व्यवहारात सोप्या भाषेत अर्थ असा की, महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत शासनाने निवडलेल्या प्रकल्पांनाच फक्त पाण्याची हक्कदारी दिली जाईल. या निवडक प्रकल्पातही उपसा सिंचनाला हक्कदारी लागू होणार नाही कारण तेथे अद्याप कायद्यान्वये कार्यक्षेत्र निश्चित केलेले नाही. बांधकामाधीन प्रकल्पातही "संबद्ध तरतुदींचे अनुपालन" अद्याप केले नसल्यामूळे तेथेही हक्कदारी नसणार. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात सर्वत्र पाण्याची हक्कदारी लागू झाली असा डांगोरा पिटण्यात काही अर्थ नसून खूप छोटया क्षेत्रापुरता हा प्रयोग मर्यादित आहे. जाणकारांचे तर असे भाकित आहे की, जागतिक बॅंकेकडून मिळालेल्या पैशाची एकदा विल्हेवाट लागली की हा मर्यादित प्रयोगही गुंडाळण्यात यॆईल.
() बिगर सिंचनाकरिता १७ सप्टेंबर २०१० पूर्वी जे पाणी वाटप करण्यात आले त्यात आता बदल होणार नाही(कलम ३१ख). इतकेच नव्हे तर त्याबद्दल आता न्यायालयात सुद्धा दाद मागता येणार नाही(कलम ३१ग).असेही  बदल पूर्वलक्षी पद्धतीने कायद्यात करण्यात आले.
          समिती न नेमता, व्यापक विचार विनिमय न करता प्रथम घाईगडबडीने कायदा केला. कल्याणकारी राज्याची संकल्पना सोडून दिली. "खाऊजा"धोरणाच्या अंमलबजावणी करिता सुधारणा करण्याचा आव आणला. त्या करताना काय झेपेल, किती पेलवेल याबद्दल तारतम्य बाळगले नाही. जागतिक बॅंकेपुढे अगतिक होऊन काय वाट्टेल ते स्वीकारले. जे स्वीकारले त्याची प्रामाणिक अंमलबजावणी केली नाही. अडचणी जाणवायला लागल्यावर परत व्यापक विचार विनिमय न करता चोरी-चुपके मध्यरात्री कायदा बदलून टाकला. यातून शासनाने काय साध्य केले? हसे कोणाचे झाले? कायदा करण्यापूर्वीची जल व्यवस्थापनाची स्थिती आणि आता कायद्याच्या तथाकथित "अंमलबजावणी" नंतरची स्थिती यात काय गुणात्मक फरक आहे? सर्व सामान्य पाणी वापरकर्त्याच्या दृष्टीने गेल्या सात वर्षात नक्की काय बदल झाले? बदलले बदलले म्हणता म्हणता सगळे तेच तर राहिले! इंग्लिशमध्ये म्हणतात -"द मोअर इट चेंजेस, मोअर इट रिमेन्स द सेम!!" हे सर्व अज्ञानापोटी झाले का या वेडेपणामागे काही पद्धत आहे? मेथड बिहाईंड द मॅडनेस? उपसा सिंचनाच्या खालील उदाहरणावरून कदाचित उत्तर मिळेल.
         महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ हा मूलत: प्रवाही सिंचनाचा कायदा आहे. उपसा सिंचनाबाबत त्यात फारशा नेमक्या अशा तरतुदी नाहीत. उपसा सिंचनाचे वाढते प्रमाण व त्याचा प्रवाही सिंचनावर होणारा  बरा- वाईट परिणाम पाहता उपसा सिंचनाला कायद्याच्या कक्षेत आणणे जरूर होते. महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-य़ांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ या कायद्यात म्हणून उपसा सिंचन पाणी वापर संस्थांसाठी एक स्वतंत्र प्रकरण (कलम क्र.३९ ते ५१) जाणीवपूर्वक घालण्यात आले. उपरोक्त कायद्याच्या नियमात(प्रकरण -/ नियम क्र. २४,२५,२६) सूस्पष्ट तरतुदी करण्यात आल्या. ..नि.प्रा. कायद्यात ही उपसा सिंचनाकरिता विशिष्ट कलमांचा - क्र. १२ ()(), (.) आणि १४() - समावेश करण्यात आला. पण या सर्वाची ज्यांना अंमलबजावणी करायची नव्ह्ती त्यांनी वेगळेच पिल्लू काढले. उपसा सिंचनाची कार्यक्षेत्र निश्चिती करणे अवघड आहे असा कांगावा त्यांनी सुरू केला. आता यापूर्वी उपसा सिंचनाला भरमसाठ परवानग्या देताना कार्यक्षेत्र निश्चित न करता परवानग्या दिल्या का? त्यावेळी नकाशे तयार केले नाहीत का? सातबारा तपासून गट/सर्व्हे क्रमांकानुसार लाभधारकांच्या याद्या बनवल्या नाहीत का? मग आताच का अडचण आली? असे प्रश्न विचारून शासनाने खरेतर संबंधितांना कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या कडक सूचना द्यायला हव्या होत्या. पण बहुदा शासनालाही ते नकोच होते. मग अशावेळी शासन जे नेहेमी करते ते शासनाने केले. उपरोक्त कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे ठरविण्याकरिता  जानेवारी २००८ मध्ये एक समिती नेमली गेली. अस्मादिक त्या समितीचे सदस्य-सचिव होते. समितीने इमाने-इतबारे काम करून नोव्हेंबर २००८ मध्ये शासनास  मार्गदर्शक तत्वांसह आपला अहवाल सादर केला. तीन वर्षांनी डिसेंबर २०११ मध्ये मी स्वेच्छा-सेवानिवृत्त झालो. तो पर्यंत तरी त्या अहवालाबाबत शासनस्तरावर काहीही झालेले नव्हते. एवढे कायदे करून ही परत उपसा सिंचन ख-या अर्थाने आजही कायद्याच्या कक्षेत नाही. पण विरोधाभास असा की नवीन कायद्यांनुसार उपसा सिंचन पाणी वापर संस्था स्थापन केल्या नसतानाही अनेक प्रकल्पांवर "प्रकल्पस्तरिय पाणी वापर संस्था" मात्र स्थापन केल्या जात आहेत. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की उपसा सिंचनाचे हितसंबंध सांभाळण्याकरिता प्रवाही सिंचनाचा बळी देण्यात येत आहे. जलाशय, नदी व मुख्य कालव्यावरून अनिर्बंध उपसा करणा-यांना मोकळे सोडण्यात आलेले आहे आणि प्रवाही सिंचनावर अवलंबून असणा-यांना कोरडे पाणी वापर हक्क देण्यात येत आहेत. पाण्याचे हे राजकारण जलवंचित व त्यांचे प्रतिनिधी कधी समजावून घेणार आहेत? अर्ध-न्यायिक म..नि.प्रा.समन्यायी पाणी वाटपासाठी काय करणार आहे? नक्की काय करते आहे?
          जागतिक बॅंकेच्या दडपणाखाली  खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाची धोरणे स्वीकारायची. सुधारणा व पुनर्रचना सुरू केल्याचा आभास निर्माण करायचा. त्यानिमित्ताने  कोटयावधी डॉलर्सची कर्जे लाटायची. एकदा आर्थिक हितसंबंध साधले गेले की, हाती घेतलेल्या सुधारणाही बिनदिक्कत अर्धवट सोडून द्यायच्या. आणि परत सरंजामी व्यवहार खुले आम चालू ठेवायचा असे तर जलक्षेत्रात होत नाही नाजलक्षेत्रातील हे जीवघेणे भोवरे व तळाचा थांगपत्ता लागू न देणारे डोह एकीकडे तर समन्यायाची केविलवाणी कागदी नाव दूसरीकडे! लढा असमान आहे. निदान आज तरी!
         

(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[१२ ते १८ एप्रिल २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)


       
       

    


        

         
         




Friday, April 13, 2012

(8) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (म.ज.नि.प्रा.२००५) उद्दिष्टे, संदर्भ चौकट,मजनिप्राची रचना,


लाभक्षेत्रे - कुरूक्षेत्रे
"विधि"लिखित - "जल-वास्तव" -  "जल-स्वप्न"
-- प्रदीप पुरंदरे
भाग १. - "विधि"लिखित
  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (..नि.प्रा.२००५)

उद्दिष्टे:
मजनिप्रा कायद्याची खाली नमूद केलेली उद्दिष्टे मूलभूत व खूप  महत्वाची आहेत.
() राज्यातील जलसंपत्तीचे नियमन करणे. म्हणजे भूपृष्टावरील तसेच भूगर्भातील पाणी आणि सर्व प्रकारच्या पाणी वापराचे (शेती, पिण्याचे व घरगुती, औद्योगिक) नियमन करणे.
() जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी आणि शाश्वत व्यवस्थापन, वाटप व वापर होईल याची खात्री करणे
() विविध प्रकारच्या पाणी वापरासाठी पाणी पट्टीचे दर निश्चित करणे
() सर्व प्रकारच्या पाणी वापराचे हक्क निश्चित करणे, ते प्रदान करणे आणि त्यांची अंमलबजावणी व संनियंत्रण करणे
वरील उद्दिष्टे पाहता हे लक्षात येते की मजनिप्राचे कार्यक्षेत्र व अधिकारांची व्याप्ती  फार मोठी आहे. जलक्षेत्रात एक कळीची भूमिका बजावण्याची सूसंधी मजनिप्राला आहे असे त्यामूळे काही अभ्यासकांना वाटते तर काही जणांच्या मते मात्र मजनिप्राचे कार्यक्षेत्र व अधिकार हे जल संपदा विभागाच्या नैसर्गिक कार्यक्षेत्र व अधिकारांवरील अतिक्रमण आहे. नक्की काय ते कदाचित काळच ठरवेल.
संदर्भ चौकट:
मजनिप्राने आपली उद्दिष्टे एका चौकटीत / विशिष्ट संदर्भात पार पाडायची आहेत. कायद्याने मजनिप्राला घालून दिलेल्या चौकटीच्या चार बाजू खालील प्रमाणे आहेत:
() राज्याची जलनीती
() राज्य जल मंडळाने (कलम १५) बनवलेला व राज्य जल परिषदेने (कलम १६) मंजूर केलेला एकात्मिकृत राज्य जल आराखडा
() राज्यपालांचे निदेश (कलम ११ (), २१)
() राज्य शासनाचे निदेश (कलम २३)
लोकशाही पद्धतीत काही बंधने व संतुलन (चेकस् ऍन्ड बॅलन्सेस्) असणे अपेक्षितच असते. त्यानुसार वरील चौकट "स्वतंत्र" नियमन प्राधिकरणालाही आवश्यकच आहे. त्यामूळे मजनिप्राच्या स्वतंत्रतेवर बंधने येतात व स्वायत्ततेला बाधा येते असे म्हणणे तितकेसे खरे नाही. शेवटी, कोणत्याही संस्थेची स्वतंत्रता किंवा स्वायत्तता ही तिच्या कर्त्याधर्त्या व्यक्तींवरही फार अवलंबून असते. निवडणूक आयोग आणि सी..जी.सारख्या संस्थांबाबत हा अनुभव नेहेमीच येतो. कर्ताधर्ता खमक्या असेल आणि त्याने हिंमत दाखवली तर त्याच चौकटीत फार वेगळ्या गोष्टी होताना दिसतात. सिंचन आणि बिगर सिंचन यांच्या स्पर्धेत आज सिंचनाची बाजू तुलनेने कमकुवत आहे. तीला बळ देण्याचे काम करून मजनिप्रा एक महत्वाची भूमिका म्हटले तर पार पाडू शकते.
 राज्याच्या व्यापक हितास्तव नेहेमी तपशील तपासणारे तटस्थ निरीक्षक वरील संदर्भ-चौकटीबाबत मात्र काही वेगळे मुद्दे मांडतात. २००३ साली राज्याने जलनीती स्वीकारली. दर पाच वर्षांनी त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. २००८ साली ती सुधारणा व्हायला हवी होती पण अद्याप  झालेली नाही. राज्य जल मंडळ व राज्य जल परिषद अस्तित्वात येऊन सात वर्षे झाली. पण ती कार्यरत नाहीत. एकात्मिकृत राज्य जल आराखडा कायदा अंमलात आल्यापासून सहा महिन्यात तयार होणे अपेक्षित होते. आज सात वर्षे होऊन गेली तरी तो आराखडा अद्याप उपलब्ध नाही. मागास भागांसाठी काही विशेष अधिकार राज्यपालांना पूर्वीपासूनच आहेत;त्यात नवीन ते काय?. पाणी वापर हक्कांबाबत मजनिप्राचे अधिकार कमी करून  कायद्याला अभिप्रेत असणारी जल नियमनाची चौकट राज्य शासनाने एकतर्फी बदलून टाकली आहे. हे मुद्दे महत्वाचे आहेत. त्यांची वेळीच दखल घेणे योग्य होईल. अन्यथा, जल नियमनाची अर्ध-न्यायिक प्रक्रिया व ती राबवणारे प्राधिकरण शंकास्पद होऊ शकतात.
 मजनिप्राची रचना:
कलम ४ अन्वये म..नि. प्राधिकरणात खालील ३ व्यक्तींचा समावेश आहे.
अध्यक्ष( सेवानिवृत्त मुख्य सचिव किंवा समतुल्य दर्जाची व्यक्ती)
सदस्य(जल संपदा अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्न्य)
सदस्य(जल संपदा अर्थव्यवस्था क्षेत्रातील तज्न्य)
कलम ५ अन्वये एका निवड समितीच्या शिफारशीनुसार राज्यपालांकडून अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. प्राधिकरणाला मदत करण्याकरिता प्रत्येक नदी खोरे अभिकरणाच्या क्षेत्रातून एक याप्रमाणे पाच विशेष निमंत्रितांची नेमणूक शासन करते. दैनंदिन कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी प्राधिकरण सचिवाची नियुक्ती करते. या एकूण रचनेबाबत काही आक्षेप घेतले जातात. ते पुढीलप्रमाणे - "प्राधिकरण ही अर्ध-न्यायिक व्यवस्था असल्यामूळे सनदी अधिका-याऎवजी अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश असायला हवेत. जल संपदा विभागाचे दोन्ही सचिव निवड समितीचे स्वत: सदस्य असताना ते स्वत:चीच नियुक्ती प्राधिकरणावर सदस्य अथवा सचिव म्हणून करून घेतात. निवड समितीचे निकष व कार्यपद्धती पारदर्शक नाही. अमूक विशिष्ट व्यक्तीचीच नेमणूक का केली हे एक प्रक्रिया म्हणून स्पष्ट केले जात नाही. शासनाच्या  एकाद्या विभागाचा माजी सचिव आणि जल संपदा क्षेत्रातील तज्न्य यात दोहोत जमीन अस्मानाचा फरक आहे. कायद्याला सदस्य म्हणून नोकरशहा अपेक्षित नाही्त. शासनाचे वरिष्ठ आधिकारी म्हणून ज्या व्यक्तींनी आयुष्याची ३०-३५ वर्षे काम केले ते आता सेवानिवृत्ती नंतर अचानक स्वतंत्रपणे काम करतील व न्यायाधीशाच्या भूमिकेला न्याय देतील हे संभवत नाही. असे होण्याची शक्यता आहे की शासनाच्या सेवेत असताना त्यांनी जे निर्णय घेतले त्यासंबंधीच काही प्रकरणे त्यांच्यापुढे निवाडा करण्याकरिता येऊ शकतात. असे झाल्यास, "सांभाळून घेतले जाणे" अशक्य नाही.बोटचेपी भूमिका घेतली जाऊ शकते. प्राधिकरणावरच्या सर्वच नेमणूका या राजकीय आहेत. सत्ताधा-यांनी त्यांच्या सोईची "आपली" माणसे नेमली आहेत. ते कधीच स्वतंत्र व प्रसंगी कठोर निर्णय घेणार नाहीत. पाणी वापरकर्त्यांचा एकही प्रतिनिधी प्राधिकरणावर नाही हे अर्थातच एकूण बनावाला धरुनच आहे." भरपूर अधिकार असतानाही प्राधिकरणाचे गेल्या ७ वर्षातील काम चमकदार, उठावदार व तडफदार का झाले नाहीपाणी वापरकर्त्यांना प्राधिकरणाबद्दल विश्वास व आपुलकी का वाटत नाही? आणि अधिका-यांवर प्राधिकरणाचा वचक का नाही? पाण्याच्या समन्यायी वाटप व वापराबद्दल किंवा सिंचनाच्या प्रादेशिक अनुशेषाबाबत किती याचिका प्राधिकरणासमोर आल्या? प्राधिकरणाने आजवर ज्यांना खरेच "मूलभूत" म्हणता येईल असे किती व कोणते निर्णय घेतले? या प्रश्नांची उत्तरे शोधु पाहता वरील टीका अगदीच गैरलागू आहे असे म्हणणे जरा अवघडच जाणार आहे. अर्थात, या सर्वाला दूसरीही एक बाजू आहे. जलक्षेत्रात आजवर शासनाचीच मक्तेदारी आहे. त्यामूळे शासनाच्या दैनंदिन प्रशासकीय निर्णय प्रक्रियेपासून अलिप्त होते किंवा आहेत असे तथाकथित स्वतंत्र तज्न्य आहेत कोठे? हा ही महत्वाचा प्रश्न आहे. राजकारण न आणता प्राधिकरणाला काम करू दिले जाईल किंवा करू दिले जावे अशी अपेक्षा बाळगणे हे अति बाळबोध तर होत नाही ना? शेवटी "कालव्यातून पाणी नाही राजकारण वाह्ते" हे कटू सत्य नाकारून कसे चालेल?

 (हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[५ ते ११ एप्रिल २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)   


        

         
         




(7) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (म.ज.नि.प्रा.२००५)


लाभक्षेत्रे - कुरूक्षेत्रे
"विधि"लिखित - "जल-वास्तव" -  "जल-स्वप्न"
-- प्रदीप पुरंदरे
भाग १. - "विधि"लिखित
  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (..नि.प्रा.२००५)
    महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ (..नि.प्रा.२००५) या कायद्याच्या रूपाने पाण्याबद्दल दाद मागण्याकरिता आता एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. काही नवीन शक्यता तसेच काही संभाव्य धोकेही निर्माण झाले आहेत.केवळ शेतक-यांनीच नव्हे तर सर्व पाणी वापरकर्त्यांनी ते अभ्यासले पाहिजेत. पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी, औद्योगिक वापराचे पाणी आणि शेतीचे पाणी अशा सगळ्याच पाण्याचे नियमन यापुढे म..नि.प्रा.२००५ या कायद्याने होणार आहे. पाणी प्रश्नाची सोडवणूक करताना आता या नवीन कायद्याचा वापर कोणालाच टाळता येणार नाही. ..नि.प्रा.२००५ हा नवीन कायदा आणि त्या कायद्यान्वये अस्तित्वात आलेले नवीन प्राधिकरण याचा आढावा म्हणूनच आपण पुढच्या ३-४ लेखात घेणार आहोत.
पार्श्वभूमि:
    सतत बदल हे जीवनाचे वैशिष्ठय आहे. काळ बदलतो. वेळ बदलते. परिस्थितीत फरक पडतो. नवनवीन धोरणे येतात.आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर त्याचे बरे वाईट परिणाम होतात. पाण्याच्या बाबतीतही हेच घडते आहे. पाणी आता एक वेगळे वळण घेऊ पाहत आहे. इतिहास कुस बदलतो आहे. पाणी वापरकर्त्यांनी त्याचे केवळ मूक साक्षीदार न राहता त्या इतिहासाला निर्णायक वळण दिले पाहिजे. आपले हितसंबंध आपणच जपायला पाहिजेत.
       १९९१ साली या बदलाला सुरुवात झाली. देशाने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. खाउजा [खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण] हे या नवीन धोरणाचे नाव! परिणाम? विविध क्षेत्रातून शासनाने अंग काढुन घ्यायला सुरुवात केली.स्वत:ची मक्तेदारी शासनाने स्वत:च संपवली आणि इतर खेळाडूना मैदान मोकळे केले. शासकीय गुंतवणुकीकरिता पूर्वी प्रयत्न व्हायचे.आता निर्गुंतवणुकीची घाई सुरू झाली. त्यासाठी मुळी स्वतंत्र खातेच जन्माला आले. जनतेने स्वत:च्या पायावर उभे रहावे म्हणून पांगुळगाडा काढून घेतला म्हणायचे की दिले सोडून वा-यावर असे म्हणायचे? काय झाले इतर क्षेत्रात? जलक्षेत्रात काय होईल? दूर्बळांना आधार मिळेल का सबळांच्या गळ्यातले लोढणे दूर होईल?
        विविध क्षेत्रातून शासनाने माघार घेतल्यावर त्या जागी खाजगी कंपन्या यायला लागल्या. त्या खाजगी कंपन्यांचे नियमन करण्याकरिता मग आली स्वतंत्र नियामक प्राधिकरणे. महत्वाचे सार्वजनिक निर्णय कोणतेही राजकारण न आणता केवळ गुणवत्ते आधारे घेण्याकरिता तज्न्यांचे अर्ध-न्यायिक (क्वासी ज्युडिशियल) व्यासपीठ हे त्याचे अधिकृत बाह्य स्वरूप! आर्थिक क्षेत्रात सेबी [एस..बी.आय.], विम्याकरिता आय. आर.डी.., टेलिफोनकरिता ट्राय[टि. आर. .आय.] ही झाली केंद्र पातळीवरील स्वतंत्र नियामक प्राधिकरणांची  काही उदाहरणे. एम..आर.सी. हे वीजेच्या क्षेत्रातले महाराष्ट्र स्तरावरचे अशा प्राधिकरणाचे प्रसिद्ध उदाहरण. याच धर्तीवर महाराष्ट्रात जलक्षेत्रात म..नि.प्राधिकरणाची स्थापना झाली. भारतातले हे अशाप्रकारचे जलक्षेत्रातले पहिलेच उदाहरण. काय आहे हे प्राधिकरण? त्याची उद्दिष्टे काय? रचना काय? कसा आहे कायदा त्याचा? आणि या सगळ्याचा व शेतक-याचा काय संबंध आहे? शेतीला त्यामूळे पाणी मिळणार का? पुरेसे व वेळेवर मिळणार का? पाणीपट्टी वाढणार तर नाही ना? पाटक-याऎवजी किंवा त्याच्या जोडीने ह्यो नवीन दादला तर अजून उरावर बसणार नाही ना? पाण्याची व पाणीपट्टी वसुलीची हमी नसताना  तुटके फुटके कालवे ताब्यात घ्यायला जेथे पाणीवापर संस्थाही तयार नसतात तेथे खाजगी कंपन्या कोठून येणारमग जल संपदा विभाग या शासकीय खात्याचेच नियमन हे नवीन प्राधिकरण करणार का? म्हणजे मग एका लालफितीवर अजून एक जास्त गडद रंगाची जाडसर लालफित असे तर होणार नाही ना? एक ना दोन...या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता शेतक-यांनी मिळवायला हवीत. त्या दॄष्टिने या सदरात प्रयत्न करूयात.
कायद्याची प्रक्रिया:
      पाणी वापर संस्थांसाठीच्या कायद्याचा [एम.एम.आय.एस.एफ.] मसुदा तयार करण्याकरिता शासनाने समिती नेमली होती. -यापैकी व्यापक विचार विनिमयातून तो कायदा तयार करण्यात आला हे आपण यापूर्वी या सदरात पाहिले आहे. . .नि.प्रा. कायद्याबाबत मात्र शासनाने असे काही केले नाही. पारदर्शकता व लोकसहभागाच्या अभावामूळे या कायद्याच्या हेतूंबद्दल जलक्षेत्रातील प्रामाणिक व अभ्यासू कार्यकर्त्यांना तसेच तटस्थ तज्न्यानाही गंभीर शंका आहेत. या कायद्याचा अभ्यास करताना एखाद्या प्रगत पाश्चिमात्य देशाच्या कायद्याचे तर आपण वाचन करत नाही ना असे सारखे वाटत राह्ते. कायद्याची भाषा व एकूण सूर, त्यातील प्रसंगी अव्यवहार्य वाटणा-या तरतुदी व त्या मागची लिखित /अलिखित गृहिते पाहिली तर भारत देशी महाराष्ट्र नामे राज्यात हा कायदा अंमलात येण्यासारखी सामाजिक-राजकीय तर सोडा अगदी अभियांत्रिकी स्वरूपाचीसुध्दा परिस्थिती नाही हे सहज लक्षात येते. पुढील एकाच उदाहरणावरून या न शिजलेल्या भाताची परीक्षा करता येईल.नदीखो-याच्या पातळीवर समन्यायाने पाणी देण्याकरिता प्रसंगी वरच्या धरणातून खालच्या धरणाकरिता पाणी सोडले जाईल अशी एक तरतूद या कायद्यात आहे. हेतू स्तुत्य आहे. पण त्याकरिताची तयारी? गृहपाठ? महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ ची अंमलबजावणी न झाल्यामूळे आज छोटयाशा चारीवर देखील शेवटच्या भागात पाणी पोहोचत नाही. तेथे नदीखो-याच्या पातळीवर समन्यायाची जादू लगेच करता येईल का? दोन वर्षापूर्वी जायकवाडीच्या जलाशयात पाणीसाठा फार कमी होता म्हणून मराठवाडयातून अगदी जबाबदार व्यक्ती व संस्थांनी म..नि. प्राधिकरणाकडे अधिकृतरित्या मागणी केली की कायद्याप्रमाणे नाशिक भागातल्या धरणातून जायकवाडीकरिता पाणी सोडा.काय झाले? सोडले पाणी? केली अंमलबजावणी कायद्याची? मराठवाडयामध्ये सोशिकतेचा अनुशेष कधीच नव्हता म्हणून पाठपुरावा झाला नाही एवढेच! अन्यथा?
      दुसरे उदाहरण पहा. ..नि.प्रा. कायद्याने पाणी ही व्यापारयोग्य व हस्तांतरणीय [ट्रेडेबल व ट्रान्सफरेबल] बाब ठरवली आहे. कोणताही शहाणा व्यापारी बाजारात उतरताना काय बघेल? मालाचा पुरेसा साठा आहे ना? नक्की  किती आहे? माल कोणत्या दर्जाचा आहे? तो बाजारात नेण्याकरिता सक्षम व विश्वासार्ह वितरण व्यवस्था आहे का? मालाची मध्येच गळती आणि चोरी तर होणार नाही ना? मी लावलेली किंमत गि-हाईकाला परवडेल का? आणि या व्यवहारात मला फायदा किती होईल? कोठल्याही गल्लीबोळातील किरकोळ किराणा दुकानदाराला जे प्रश्न पडतील ते जल संपदा विभागाला वा म. .नि.प्राधिकरणाला पडलेले दिसत नाहीत. अन्यथा, सिंचन प्रकल्पांच्या जलाशयात नक्की पाणी किती व गाळ किती? कालव्यांची प्रत्यक्ष वहनक्षमता किती? पाणी मोजायची व्यवस्था काय? कालव्यातून गळती, पाझर, वहन व्यय नक्की किती होतात? पाणी चोरी कशी रोखणार? पैसे देऊन माल घेणारे गि-हाईक किती? पाण्याचे नियंत्रण व नियमन करण्याकरिता कालव्यावर दारे (गेटस्) व काट नियामक (क्रॉस रेग्युलेटरस्) आहेत का? या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नसताना अचानक पाणी-व्यापा-याचे सोंग घेऊन जल संपदा विभाग आणि म..नि.प्राधिकरण चक्क बाजारात उतरते याला काय म्हणावे? अद्न्यानाने केलेले धाडस? अंधारात मारलेली उडी? अव्यापारेशु व्यापार? की चक्क "ठोकून देतो ऎसा जे"?
     तिसरे उदाहरण तर लै भारी! पाणी वापर हक्काचे निकष निश्चित करण्यासंदर्भात प्राधिकरणाला आपण जरा जास्तच अधिकार देऊन बसलो, आपल्या हितसंबंधाना उद्या ते घातक ठरेल, शेतीचे पाणी उद्योगधंदय़ांकडे वळवण्याचे आपले वादग्रस्त निर्णय उद्या बदलले जाऊ शकतात हे लक्षात आल्यावर अजून धड अंमलातही न आलेला कायदा सत्ताधा-यांनी मध्यरात्री बदलून टाकला. प्राधिकरणाचे पंख कापायला सुरुवात केली.
         ..नि.प्राधिकरणामुळे  जलक्षेत्रात एक नवीन भोवरा निर्माण झाला आहे. मंत्रालयात जल धोरणासंबंधी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामूळे एक नवीन वादळ राज्याच्या किना-यावर धडकण्याची शक्यता आहे. त्या वादळाचा केंद्रबिंदू कदाचित मुंबईत कफ परेडला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नवव्या मजल्यावर म..नि.प्रा.च्या वातानुकुलित कार्यालयात असेल.
     तात्पर्य? ..नि.प्रा. चा कायदा समजाऊन घेणे महत्वाचे आहे. आपल्याला वादळ अंगावर घेऊन लाटेवर स्वार व्हायचे आहेकायद्यात जाणीवपूर्वक सुधारणा घडवायच्या आहेत. लोकाभिमूख सशक्त जल कायदा व त्याची जनवादी अंमलबजावणी  हे शेतक-याचे लाईफ-जॅकिट [बुडु नये, पाण्यावर तरंगत रहाता यावे म्हणून घालावयाचे जाकीटठरू शकते.
(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[२९ मार्च ते ४ एप्रिल २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)