Monday, November 17, 2014

Rules of MIA 76 not prepared for 38 years

PRESS NOTE
PIL for preparing Rules of MIA76

A PIL has been filed in the Aurangabad bench of Bombay High Court with a prayer that WRD may be directed to prepare rules of MIA76 within stipulated time.  Pradeep Purandare, retired Associate Professor, WALMI, Aurangabad has filed the PIL through Ad. Prakash Paranjape. Bench comprising of Hon. Justice Sh. B.P. Dharmadhikari & Hon. Justice Sh. Badar A.M will hear the petition.

The Secretary (Water Resources Planning & Development) and The Secretary (Water Resources Management & Command Area Development) of Water Resources Department (WRD) are the respondents.

MIA 76 is the parent Act of WRD. It has a potential to provide solid foundation & robust framework for water resources development & management in the State. But unfortunately rules of MIA 76 have not been prepared for last 38 years. As such, MIA76 is not in force in the truest sense of the term for all practical purposes. Things become more serious as implementation of River Basin-wise Irrigation Development Corporation Acts 1996-98,  MMISF Act 2005  & MWRRA Act 2005 depends upon implementation of MIA 76. Hence, the prayer - WRD may be directed to prepare rules of MIA76 within stipulated time.

Aurangabad bench of The Bombay High Court has issued notices to all the respondents in this matter on 17 Nov 2014 & has asked them to file their affidavits up to 15 Jan 2015
It may be recalled that Purandare has also recently filed a PIL to operationalise River Basin Agencies, State Water Board & State Water Council to prepare Integrated State Water Plan as per MWRRA Act.
-          Pradeep Purandare
Retd. Asso. Prof. WALMI, Aurangabad

17 Nov 2014

अडोतीस वर्षांपुर्वी झालेल्या कायद्याचे नियम बनविण्यासाठी जन हित याचिका



प्रेस नोट

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६ या कायद्याचे नियम ३८ वर्षे झाली तरी अद्याप बनविण्यात आलेले नाहीत. ते नियम आता तरी त्वरित बनवावेत या साठी प्रदीप पुरंदरे, सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी,औरंगाबाद यांनी एड.प्रकाश परांजपे यांच्या मार्फत बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  एक जन हित याचिका दाखल केली आहे. मा. न्या.श्री.बी. पी. धर्माधिकारी व मा.न्या.श्री.बदर ए.एम. यांच्या समोर त्या बाबत दि. १७ नोव्हेंबर २०१४ रोजी सुनावणी झाली.

 जल संपदा विभागाच्या  दोन्ही सचिवांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६ हा कायदा राज्यातील सिंचनविषयक कायद्यांचा पालक कायदा आहे. त्या कायद्याआधारे सिंचन व्यवस्थापनाला आवश्यक तो पाया व चौकट प्राप्त होऊ शकते. पण दुर्दैवाने कायदा झाल्यापासून आजपावेतो म्हणजे तब्बल ३८ वर्षे या कायद्याचे नियम बनविण्यात आलेले नाहीत. नियमांअभावी कायदा ख-या अर्थाने अंमलात आलेला नाही. नदीखोरेनिहाय पाटबंधारे विकास महामंडळांचे पाच कायदे, महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-याकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) अधिनियम २००५ या कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६ या कायद्यावर अवलंबून असल्याने त्या कायद्याचे नियम विशिष्ट मुदतीत  तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जल संपदा विभागास  द्यावेत अशी विनंती या याचिकेद्वारे  करण्यात आली आहे.

मा.उच्च न्यायालयाने  दि.१७ नोव्हेंबर २०१४ रोजी  प्रतिवादींना नोटिसा जारी केल्या असून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी त्यांना १५ जानेवारी २०१५ पर्यंत मुदत दिली आहे.

मजनिप्रा  कायद्यानुसार २००५ सालीच स्थापन झालेली  नदीखोरे अभिकरणे, राज्य जल मंडळ व राज्य जल परिषद ही  वैधानिक व्यासपीठे कार्यरत करावीत आणि एकात्मिक राज्य जल आराखडा विशिष्ट मुदतीत तयार करावा या मागणीसाठीही पुरंदरेंनी यापूर्वी  एक जन हित याचिका दाखल केली आहे.

-प्रदीप पुरंदरे


Thursday, October 23, 2014

मराठवाड्याचे पाणी आणि विकासाची करुणाष्टके



घडीने घडी शीण अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे
उदासीन हा काळ जातो गमेना, सदासर्वदा थोर चिंता शमेना
अवस्था मनी होय नाना परीची, किती काय सांगु गती अंतरीची

विचाराअंती जाणीवपूर्वक नास्तिक झालेल्या व्यक्तीस करुणाष्टकातील वरील ओळी आठवाव्यात अशी परिस्थिती आज मराठवाड्यात आहे. मराठवाड्याचे पाणी आणि एकूणच विकासाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात आज असहाय्यता, हतबलता, आणि उद्विग्नता आहे. ‘बहू पाहता अंतरी कोंड होतो’ या भावनेतून ‘उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे’ असा प्रश्न तो विचारतो आहे. क्षणभर थांबून, अभिनिवेश सोडून आणि अंतर्मूख होऊन आपण त्याच्या – नव्हे, आपल्याच मनामनातील ठसठसणा-या प्रश्नाला - प्रामाणिक उत्तर देणार आहोत का? परिस्थिती गोंधळाची आहे. विसंगतींची युती आणि वारसा हक्काने आलेल्या जटील प्रश्नांची आघाडी अद्याप बळकट आहे. सोप्या, रेडिमेड आणि ‘बस, दो मिनिट’ वाल्या उत्तरांबद्दल भ्रमनिरास झाला आहे. या पार्श्वभूमिवर पाण्याच्या अंगाने विकासाबद्दल - आकडेवारी व तांत्रिकता मुद्दाम टाळून - काही मुद्दे मांडण्याचा एक  प्रयत्न या लेखात केला आहे. ‘काय करु रे क्रिया घडेना’ असे होऊ नये ही आशा!

निझामकालीन गुलामगिरीतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून मराठवाडा अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. संतांच्या भूमित ‘ठेविले अनंते’ चा पगडा अद्याप जाणवतो.  सरंजामशाही अजून संपलेली नाही. भांडवली लोकशाहीतून जे काही किमान बदल व्हायला पाहिजेत ते व्हायच्या अगोदरच नवउदारमतवादाची चाहूल लागली आहे. एकीकडे सरंजामशाही तर दुसरीकडे चेल्याचपाट्यांची भांडवलशाही (क्रोनी कॅपिटॅलिझम) असे घातक मिश्रण तयार झाले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात तंत्रज्ञानविषयक काही बदल होत असले तरी जातजमातवाद आणि धार्मिक उन्मादही जोरात आहेत.  विचारात व त्याआधारे केलेल्या जाणीवपूर्वक पुरोगामी कृतीत आधुनिकता न दिसता चंगळवादात ती फडफडते आहे. कराराखालील शेती वाढते आहे. शेती व पाणी  यांच्या  कंपनीकरणाची चाहूल लागली आहे. या सा-याचे प्रतिबिंब पाण्यात पडणे साहजिक आहे. त्यामूळे पाणी गढूळ झाले आहे. त्याचा तळ लागत नाहीये.

पाण्याचे हक्क आज सर्वच ठिकाणी जमीनीच्या वैयक्तिक मालकीशी निगडीत आहेत. ज्याच्याकडे जास्त जमीन आहे, जो जमीनीच्या पोटात जेवढा खोल जाऊ शकतो, जो पाणी उपशावर वीज किंवा डिझेलकरता अफाट पैसा खर्च करू शकतो किंवा राजकीय आकडे वापरून वीज व पाणी दोन्ही चोरु शकतो त्याच्याकडे अमाप पाणी वाहताना दिसते.  सरंजामशाही व जमीनधारणेचे जास्त विषम प्रमाण पाहता   मुठभर धनदांडग्यांच्या ताब्यात पाणी असण्याचे प्रमाणही मराठवाड्यात तुलनेने अधिक आहे. पाण्याचे समन्यायी वाटप करा, पाणी जपून वापरा, पाण्याची उत्पादकता वाढवा, वगैरे मनाचे श्लोक पाणीचोरांना सांगून उपयोग होत नाही. वारंवार दुष्काळ पडत असताना मराठवाड्यात साखर कारखान्यांची संख्या व म्हणून उसाखालचे क्षेत्र वाढते आहे. पाण्याचा भांडवली वापर वाढतो आहे. उसबाधा झालेला सत्ताधारी वर्ग छोट्या व अल्पभूधारक शेतक-यांचे व शेतमजूरांचे पाणी तोडतो आहे.  लक्षावधी उसतोड कामगारांचे दरवर्षी हंगामी स्थलांतर, स्त्री-भृणहत्या व शेतक-यांच्या आत्महत्या अव्याहत चालू आहेत. सत्ताधारी वर्गाचे (त्यात सत्ताधारी व विरोधी पक्ष दोन्ही आले) पाण्यासंदर्भातील हितसंबंध स्पष्ट व क्रूर आहेत. मराठवाड्याच्या ‘अस्मितेबद्दल बोलू आम्ही’ पण मराठवाड्याचा आहे म्हणून पाण्याबाबत कोणालाही दयामाया दाखवली जात नाही. पाण्याचे समन्यायी वाटप होत नाही. परिणामी, बिनपाण्याची शेती विकून लवकरात लवकर बाहेर पडणे आणि शहरीकरणाच्या बकाल तांड्यात सामील होणे याशिवाय  जलवंचितांना पर्याय नाही. ‘तुम्ही आम्हाला पाणी देत नाही मग मराठवाड्याच्या पाणी हक्कासाठी आम्ही प्यादी म्हणून आमचा वापर का होऊ द्यावा’ असा मूक प्रश्न जागोजागी जलवंचित विचारता आहेत. मराठवाडा म्हणून विभागीय स्तरावर जो ऎतिहासिक पाणी लढा होणे खरोखरच आवश्यक आहे तो या मूलभूत कारणामूळे कायम कमकुवत राहणार हे म्हणूनच उघड आहे.

संतांचा वारसा सांगणा-या भूमित विहिर व बोअरमधून पाण्याचा व्यापार वाढतो आहे. शासकीय पाणी पुरवठा योजना मुद्दाम बंद पाडल्या जात आहेत वा पी.पी.पी.ची पिपाणी वाजवत त्यांचे खाजगीकरण केले जात आहे. अण्णा, दादा,भाऊ, काका अशा थोर मंडळींच्या मार्गदर्शनाखाली बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय (व्यवसाय कसला? चक्क धंदाच तो!)  बेगुमान वाढतो आहे. बाटलीबंद पाण्याची किंमत व त्यातील पाण्याची गुणवत्ता याबद्दल कोणतेही शासकीय नियमन नावालासुद्धा दिसत नाही. पण स्थानिक ‘विकास-पुरूषाच्या’ कृपेने अनधिकृत नळ जोडणी मिळाली, मोटार लावून पाणी खेचता येतं आणि महिन्यातून एक दोनदा पाणी मिळते यात आम्ही समाधानी आहोत. माझ्या घरात आज टॅकरचे वा बाटलीबंद पाणी मिळाले ना? बस झालं! टेन्शन नही लेनेका!! अशी वृत्ती सर्वत्र आहे.

 मृद व जल संधारण, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर), राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प अशी अनेक जल विकासाची कामे मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पण त्याचा मराठवाड्याला विसर पडला आहे. त्यांच्या देखभाल-दुरूस्ती व दैनंदिन व्यवस्थापनाकडे गुन्हेगारी स्वरुपाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याबद्दल कोणालाही जबाबदार न धरता, तेथे पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग न वाढवता आणि थोडक्यात, जी कामे झाली आहेत ती नीट पुढे न नेता किंबहूना, त्याची दखलसुद्धा न घेता वाट्टेल तेथे शिरपूर पॅटर्न आणि दिसेल तेथे साखळी बंधारे यावर विनाकारण अवास्तव भर दिला जातो आहे. दुसरीकडे, विकासाच्या नावाखाली एकदम दुसरे टोक गाठून महाकाय व अविश्वसनीय योजनांचा अट्टाहास धरला जातो आहे. नाशिक -नगर भागातून जायकवाडीसाठी हक्काचे पाणी आणण्याकरिता काहीही विशेष प्रयत्न न करणारी किंवा नांदुर-मधमेश्वरचे पाणी गंगापूर व वैजापूरसाठी धड न मिळवू शकणारी मंडळी डायरेक्ट कोकणातलं पाणी मराठवाड्यात आणायच्या बाता करत आहे.  कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत सरळ सरळ फसवणुक झाली आणि पर्यावरणीय मंजु-या घेतल्या नाहीत म्हणून कृष्णा-मराठवाडा योजना बंद पडली तरी फुकाच्या बाता सुरू आहेत. विविध प्रकारच्या जल विकासात प्रत्यक्ष काम केलेले निवृत्त अभियंते व इतर तंत्रज्ञ मराठवाड्यात अर्थातच प्रत्येक मोठ्या शहरात मोठ्या संख्येने स्थाईक झाले आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता जल विकासाबाबत ते काही करताना दिसत नाहीत. त्यांचे मौन काय दर्शवते?

वाळू व भूजलाचा बेबंद उपसा, नदी-नाल्यांवर अतिक्रमण व त्यांचे भयावह प्रदुषण, शहरांसाठी खूप लांबून उंचावर पाणी आणणे, शहरांनी त्या महाग  पाण्याचा बेजबाबदार वापर करणे, वर्षा जल संचय व जल फेरभरणाकडे दुर्लक्ष होणे, भूजल कायदाच काय कोणत्याही जल-कायद्यांची अंमलबजावणी न होणे, नदीखोरेनिहाय नैसर्गिक बंधने न जुमानता जल विकास करणे अशा अनेक कारणांमूळे मराठवाडा संकटात येऊ घातला आहे. वाळवंटीकरणाकडे अटळ वाटचाल करणा-या मराठवाड्याला आता मेगा व स्मार्ट सिटीज चे डोहाळे लागले आहेत. या नवीन शहरीकरणामूळे एकीकडे पाण्याची गरज वाढणार आहे तर दुसरीकडे स्थानिक जल स्त्रोत बुजवले जाणार आहेत. शेतीखालचे क्षेत्र कमी होणार आहे. प्रथम शिक्षणासाठी  पुणे-मुंबई आणि नंतर नोकरी करता अमेरिका अशी प्रगती साधणा-या मराठवाड्यातल्या नव्या पिढीला हे प्रश्न समजणे आता अवघड आहे. मॅडिसन स्क्वेअरच्या झगमगाटात क्रांती चौक विसरला जाणे स्वाभाविकच आहे, यु नो!

पाणी राजकीय सीमा पाळत नाही. पाण्याबाबत नदीखोरेनिहाय विचार व कृती करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे. त्यासाठी कायदा आहे. त्यात जल-सुशासनाची चौकट आहे. नदीखोरे अभिकरणे, राज्य जल मंडळ, राज्य जल परिषद आणि एकात्मिक राज्य जल आराखडा या वैधानिक स्तंभांआधारे पाण्याचे नियमन शक्य आहे. स्वायत्त अर्ध-न्यायिक प्राधिकरण त्यासाठी महत्वाचे आहे. पण काही मोजके अपवाद वगळता मराठवाड्यातील नेतृत्वाला आणि जलक्षेत्रातील अभ्यासकांनाही या सगळ्याची जाण व भान नाही. पाण्याबद्दलची आपली वैधानिक जबाबदारी लोकप्रतिनिधी विसरले आहेत. प्रत्यक्ष पाण्यापेक्षा धरण व कालव्यांच्या ठेकेदारीत त्यांना जास्त रस आहे. त्यामूळे मराठवाड्यात कोरड्या जल-विकासाचे प्रमाण वाढले आहे.

मराठवाड्यातील सरंजामशाहीचा अंत; पाणी हक्कांची जमीनीच्या मालकीपासून फारकत; उस हे केवळ पिक नाही तर ती एक प्रवृत्ती आहे हे ओळखून त्या प्रवृत्तीला परिणामकारक विरोध व उसाखालील क्षेत्रावर आणि त्यासाठीच्या पाणी वापरावर कठोर बंधने; पाण्याच्या खाजगीकरणा विरुद्ध लोक चळवळ; आजवर झालेल्या जल विकासाची लोक सहभागाद्वारे देखभाल-दुरूस्ती व शास्त्रीय व्यवस्थापन; जल स्त्रोत धोक्यात न आणता कमी पाणी कार्यक्षमतेने वारंवार वापरणारे  विकेंद्रित शहरीकरण; नद्यांचे पुनरूज्जीवन; आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनाचा स्वीकार; नदीखोरेनिहाय जलविकास व व्यवस्थापन आणि जलक्षेत्रात कायद्याचे राज्य असा मूलत: राजकीय कार्यक्रम अंमलात येऊ शकला तर कदाचित  उदासीनता कमी होईल व करूणाष्टके म्हणण्याची पाळी येणार नाही. ‘हे सर्व सांगणे सोपे आहे; करून दाखवणे अवघड’ हे अर्थातच मान्य आहे. पण प्रश्न नीट व धीट पद्धतीने मांडणे हे ही आजकाल अवघड झाले आहे हे अमान्य करता येईल का?

- प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
 [Article published in  Loksatta, Marathwada Diwali Ank, Deepotsav,2014 on 24.10.2014]




Monday, October 20, 2014

जल-शिष्टाचार कोणी पाळायचे?



औरंगाबाद
दि. २०.१०.२०१४

प्रिय संपादक,
दै. लोकसत्ता,
मुंबई

महोदय,

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यासंदर्भात "हेतू विसरून दोषांचा अभ्यास!" या माझ्या  लेखाकडे (लोकसत्ता, २२ जुलै २०१४) मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चितळे समितीने आपल्या अहवालात खूप मोठा स्फोटक तपशील दिला आहे. अहवालातील काही विधाने त्या लेखात म्हणूनच वानगीदाखल सुरुवातीला उधृत केली होती. त्यावरून सकृतदर्शनी असे दिसते की, चितळे समितीच्या अहवालाआधारे मोठे मासे गळाला लागू शकतात! पण चितळे समितीने अहवालाच्या प्रास्ताविकात, समारोपात, गोषवा-यात आणि प्रस्तावित कारवाईत  कोठेही आपले हे स्फोटक निष्कर्ष म्हणावे तसे अधोरेखित केलेले नाहीत. कोणाचीही नावे घेतलेली नाहीत. त्यामूळे त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. त्याचा फायदा घेऊन शासनाने मोघम कृती अहवाल दिला आणि मोठे मासे स्वत:ला क्लिन चिट घेऊन मोकळे झाले. प्रश्न हा आहे की, चितळे समितीने मूळात "म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही" अशा स्वरूपाची चलाखी का केली? समितीचा हेतू काय होता? राजकीय तडजोडी घडवून आणण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा केवळ एक हत्यार म्ह्णून तर फक्त वापर झाला नाही ना? ‘अमुक अमुक झाले नाही तर काढतो बघा सगळी भानगड बाहेर’ अशी गर्भित धमकी देणे हा त्या अहवालाचा हेतू होता? राष्ट्रवादीने आपणहून दिलेला पाठिंबा नाकारणे हे राजकीय शिष्टाचाराला धरून होणार नाही असे म्हणत भाजपने तो स्वीकारल्यास प्रस्तुत प्रकरण त्याच्या तार्किक परिणीती पर्यंत पोहोचेल. पण मग मूळ सिंचनाच्या दूरावस्थेचे व जलवंचितांचे काय होणार? जल-शिष्टाचार कोणी पाळायचे?

-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी.

[Letter published in Loksatta, 21.10.2014]

ते भाकित खरे ?

औरंगाबाद
दि. २०.१०.२०१४

प्रिय संपादक,
दै. दिव्य मराठी

महोदय,

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यासंदर्भात "चौकशी समितीचे राजकीय नाटक" या माझ्या  लेखाकडे (दिव्य मराठी, १९ नोव्हेंबर २०१३) मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चितळे समितीबद्दल  त्या लेखात मांडणी केल्यावर मी शेवटी पुढील विधान केले होते -  " एक शक्यता अशी वाटते की, राजकीय तडजोडी घडवून आणण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा एक हत्यार म्हणून वापर होईल". माझे ते भाकित खरे ठरावे अशी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादीने आपणहून दिलेला पाठिंबा नाकारणे हे राजकीय शिष्टाचाराला धरून होणार नाही असे म्हणणे शेवटी काय दर्शवते? जनादेशाचा आदर करून "आता तरी शहाणपणा दाखवा" (विशेष संपादकीय, २० ऑक्टोबर २०१४) हा योग्य व समयोचित सल्ला म्हणून वाया जाण्याचीच शक्यता जास्त वाटते. यश आणि शहाणपणा फार काळ एकत्र राहत नाहीत!

-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी.


[Letter published Divya Marathi , 21.10.2014]