Thursday, May 12, 2016

My poem published in Aajacha Sudharak, May 2016

पाणी मागतात ...च्यायला

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात - पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना

साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करु
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात ...च्यायला

सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात ...च्यायला

कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक. टॅक. रणगाडा ! धडाधडा....
पाणी मागतात ... च्यायला

साहेब जाऊन आले परवा चायनाला
केवढी प्रगती केली राव त्यांनी - थ्री गारजेस
सायबाला विचारलं एवढं सगळं  जमवलं कसं त्यांनी?
साहेब म्हनले - पयले तियानमेन केलं. तियानमेन! ते मेन!!
आपण काहीच करत नाही. कशी होणार प्रगती?
पाणी मागतात ... च्यायला


No comments:

Post a Comment