Tuesday, April 24, 2012

एक आवाहन



माझ्या मूळ खालील आवाहनचा संपादित भाग दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद मध्ये प्रसिद्ध झाला होता ("काटेकोर जल व्यवस्थापनाची गरज", मटा व्यासपीठ, दि.६ एप्रिल२०१२)
                                                              एक आवाहन
राज्यस्तरिय सिंचन प्रकल्प हे जलक्षेत्रात ‘सार्वजनिक वितरण व्यवस्थेची’ महत्वाची भूमिका बजावतात. पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी, औद्योगिक वापराचे पाणी व शेतीचे पाणी याकरिता राज्यातील लोकसंख्येचा फार मोठा टक्का या प्रकल्पांवर अवलंबून आहे. त्यांच्या जल व्यवस्थापनाची वस्तुस्थिती नीट कळली तर संभाव्य गंभीर जल संकटाला धीराने सामोरे जाता येईल व त्यावर मात करण्याकरिता दूरगामी उपाय योजता येतील. मोघमाकडून काटेकोरपणाकडे जाता यावे या हेतूने खालील आवाहन करण्यात येत आहे.
(१) "धरणात साठणा-या पाण्याच्या वापराचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे"[एकत्रित शासन निर्णय क्र.संकीर्ण१०.००/(१९/२०००)/सिं.व्य.(धो) दि.७.३.२००१] आणि "प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पी.आय.पी)" बाबत शासनाने सर्व मुख्य अभियंत्यांना लिहिलेले पत्र [ सीडीए १००४/(३६५/२००४) लाक्षेवि(कामे) दि.२६.१० २००४] हे दोन महत्वाचे दस्ताऎवज आहेत.  या दोन संदर्भांन्वये रब्बी हंगाम (२०११-१२) व उन्हाळी हंगाम(२०१२) या दोन हंगामांचे पाण्याचे अंदाज-पत्रक (पी.आय.पी.) प्रत्येक सिंचन प्रकल्पात अधिकृतरित्या केले गेले का? त्याला सक्षम अधिका-याने वेळीच रितसर मंजूरी दिली का? तो तपशील पाणी वापरणा-यांना कळावा याकरिता जाहीर प्रकटन काढले का? प्रत्यक्ष पाणी वाटप त्याप्रमाणे झाले का/होते आहे का? याबाबतचा तपशील जल संपदा विभागाने त्वरित जाहीर करावा. जलक्षेत्रात समन्याय असावा याकरिता आग्रह धरणा-यांनी किमान आपापल्या भागातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात तरी तो शासनाकडून त्वरित मिळवावा.
(२) सार्वजनिक क्षेत्रातल्या राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठया सिंचन प्रकल्पांचे शास्त्रीय जल व्यवस्थापन करण्याकरिता खालील बाबी किमान आवश्यक असतात. त्या मूळात आहेत का? वेळोवेळी त्यात सुधारणा करून त्या अद्ययावत केल्या गेल्या आहेत का? अचूक व विश्वासार्ह आहेत का? हा ही तपशील आता वर म्हटल्याप्रमाणे प्रकल्पवार तपासला जावा.
१) जलाशयाचे गेज-बुक (विशिष्ट वेळी घेतलेल्या पाणीपातळीच्या दैनंदिन नोंदी)
२) टॅंक चार्ट (जलाशयात आलेले पाणी, त्याचे नियोजन व प्रत्यक्ष वापर यांचा महिनावार तपशील दर्शवणारा आलेख)
३) कपॅसिटी टेबल (जलाशयात अमूक पातळीला अमूक इतके पाणी आहे हे दर्शवणारा तक्ता. यॆणारा गाळ लक्षात घेऊन तो अद्ययावत केला पाहिजे)
४) पाण्याची पातळी लक्षात घेऊन आवश्यक तेवढा प्रवाह मिळावा म्हणून धरणाचे/कालव्याचे/वितरिकेचे दार किती उघडावे हे दर्शवणारे आलेख/तक्ते
५) कालव्यात आवश्यक तेथे प्रवाह मापक / वॉटर मीटर
६) बाष्पीभवन पात्रे
७) वितरण व्यवस्थेत पाण्याचे नियंत्रण व नियमन करण्याकरिता दारे व काट नियामक (क्रॉस रेग्युलेटर्स)
८) कालव्यात सर्वत्र पाणी पोहोचावे, संकल्पित वहन क्षमता फार कमी होऊ नये व वहन व्यय आटोक्यात रहावेत म्हणून कालव्याची किमान देखभाल-दुरुस्ती
ज्या सिंचन प्रकल्पांचे जल व्यवस्थापन वरील तपशील सांभाळून शास्त्रीय पद्धतीने केले जात आहे त्यांचे कौतुक समाजाने आवर्जून करावे.
- प्रदीप पुरंदरे,  निवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद

No comments:

Post a Comment